प्रादेशिक कार्यालय बंद करण्यावर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: October 13, 2016 01:09 IST2016-10-13T00:36:08+5:302016-10-13T01:09:25+5:30
औरंगाबाद : एस.टी. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय बंद करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. विभाग नियंत्रक कार्यालय आणि वरिष्ठ कार्यालय थेट एकमेकांना जोडण्यात येणार आहे.

प्रादेशिक कार्यालय बंद करण्यावर शिक्कामोर्तब
औरंगाबाद : एस.टी. महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय बंद करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. विभाग नियंत्रक कार्यालय आणि वरिष्ठ कार्यालय थेट एकमेकांना जोडण्यात येणार आहे. यासंदर्भात सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली असून महिनाभरात निर्णय जाहीर केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्यभरात औरंगाबादसह ६ प्रादेशिक कार्यालये आहेत. प्रत्येक प्रादेशिक कार्यालयांतर्गत विभाग नियंत्रक कार्यालय आणि आगार आहेत. एकट्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जालना ही विभाग नियंत्रक कार्यालये आहेत. प्रत्येक आगारातून विभाग नियंत्रक कार्यालयास आणि विभाग नियंत्रक कार्यालयातून प्रादेशिक कार्यालयास कामकाजाचा आढावा दिला जातो. प्रादेशिक कार्यालयाकडून हा आढावा वरिष्ठ कार्यालयास (मध्यवर्ती) दिला जातो. गेली अनेक वर्षे याच पद्धतीने कामकाज केले जात आहे; परंतु या पद्धतीमुळे माहिती वरिष्ठ कार्यालयास पोहोचण्यास बराच वेळ लागतो. प्रत्येक माहिती वेळेत पोहोचण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. यासाठी विभाग नियंत्रक कार्यालय थेट वरिष्ठ कार्यालयास जोडण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. यासाठी प्रादेशिक कार्यालय बंद केल्यास फायदा आणि तोट्याचा अभ्यासही करण्यात आला.
प्रादेशिक कार्यालयांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रादेशिक बदल्यांसह विविध कामांवर परिणाम होणार आहे. विभागातील अडचणी प्रादेशिक कार्यालयामार्फत सोडविल्या जातात; परंतु ते बंद होऊन वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागण्याची वेळ येईल. त्यामुळे अडचणी वाढणार असल्याने एस.टी.कर्मचारी संघटनांकडून प्रादेशिक कार्यालये बंद करण्याच्या निर्णयास विरोध केला जात आहे.