ग्रामीण भागात धावताहेत भंगार गाड्या !
By Admin | Updated: May 26, 2014 00:26 IST2014-05-26T00:04:17+5:302014-05-26T00:26:26+5:30
लोकमत चमू , उस्मानाबाद ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसते.

ग्रामीण भागात धावताहेत भंगार गाड्या !
लोकमत चमू , उस्मानाबाद ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसते. अनेक वेळा रस्त्यात बस बंद पडून प्रवाशांचे हाल झाल्याचेही पाहावयास मिळतात. काही बसगाड्यांमधील आसन व्यवस्था पूर्णपणे कालबाह्य झाली असून, अनेक गाड्यांच्या काचा गायब झालेल्या आहेत. गाड्यांचे पत्रेही फाटलेले असल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचेपर्यंत वेगवेगळे आवाज ऐकून घ्यावे लागत आहेत. बहुतांश लांब पल्ल्याच्या बसगाड्यांची अवस्था चांगली असली तरी ग्रामीण भागात धावणार्या बसगाड्यातून मात्र प्रवाशांना अगदी नाइलाजास्तव प्रवास करावा लागत असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. सध्या खाजगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी एसटीने प्रवास करणार्या प्रवाशांच्या संख्येत मात्र घट झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांकडून चांगले उत्पन्न मिळत असतानाही चांगल्या बसगाड्यांमधून सेवा देण्यात मात्र महामंडळ कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय राखीव टायरचा अभाव, ट्रॅल बॉक्स नसणे, रिकामी प्रथमोपचार पेटी यासह इतर अनेक समस्याही बसगाड्यांमध्ये दिसून येतात. उमरगा: बहुजन हिताय, बहुजन सुखायचे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेसाठी उमरगा आगारातून धावणार्या ६१ बसेस रस्त्यावरील खड्ड्यांमुळे खिळखिळ्या झाल्या आहेत़ या खिळखिळ्या बसेसचा प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ उमरगा आगारात वाहतूक सेवेसाठी जुन्या-नव्या ६१ बसेस आहेत़ शहरासह ग्रामीण भागातील मार्गावरून या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी धावतात़ खाजगी प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे वाढलेले अपघात पाहता अनेक प्रवाशांनी बसनेच प्रवास करण्यास पसंती दिली आहे़अंध, अपंग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, विद्यार्थी आदी विविध लाभार्थ्यांना बससेवेतून तिकिटात सूट मिळत असल्याने या वर्गाची संख्याही मोठी आहे़ या आगारातील २० बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर तर २१ बसेस ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यावरून धावतात़ उमरगा आगारातून लातूर, सोलापूर, धुळे, अक्कलकोट, भुसणी, लाडवंती, कासारशिर्शी, नाईचाकूर, माकणी, लोहारा, जाजन मुगळी, केसरजवळगा, दाळींब, धानुरी आदी गावच्या मार्गावरून बसेस धावतात़ सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्या बोरिवली, भिवंडी, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, लातूर मार्गाची दुरवस्था झाली आहे़ उमरगा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तर जागोजागी खड्ड्यांचेच साम्राज्य निर्माण झाले आहे़ त्यामुळे बसेस खिळखिळा होण्याचे प्रमाण वाढले आहे़ दरम्यान, डिझेलचे वाढते दर, टमटम-काळी पिवळी वाहनांशी स्पर्धा करून प्रवाशांसाठी बस धावत आहे़ मात्र, खराब रस्त्यामुळे बसच अडचणीत येत असून, सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे़ (वार्ताहर) प्रतिमहा लाखोची दुरूस्ती या आगारातील ६१ बसेसना दिवसासाठी १५० विविध मार्गावरून दिवसाकाठी २५ हजारापेक्षा अधिक किमीचा प्रवास करावा लागतो़ सर्व मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रतिमा ४० टायर खराब होत असून, काचा, पाटे, दरवाजे, खिडक्या आदी खिळखिळ्या होत आहेत़ या दुरूस्तीसाठी आगाराला महिनाकाठी लाखो रूपये खर्च करावे लागत आहे़त रस्त्यामुळे बस बंद तालुक्यातील केरजवळगा गावाकडे जाणारी बस खराब रस्त्यामुळे गत महिन्यापासून बंद आहे़ गावाकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपब्ध होत नसल्याने बसेस बंद आहेत़ त्यामुळे गावाकडे ये-जा करण्यासाठी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ लोहारा : लांब पल्ल्याच्या बसेसची अवस्था चांगली दिसून येत असली तरी ग्रामीण भागातील बसेसची स्थिती थेट याच्या उलट असल्याचे पहावयास मिळत आहे. बसेसचा अक्षरश: खुळखुळा झालेला असतो. त्यामुळे प्रवाशांना एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाईपर्यंत कान बधीर झाल्याचा अनुभव येतो. या त्रासाला कंटाळून अनेकजण खाजगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे महामंडळाचे स्थानक नाही. पत्र्याचे शेड मारून प्रवाशांसाठी तात्पुरता निवारा करण्यात आला आहे. येथील कारभार तुळजापूर आगाराअंतर्गत चालतो. या ठिकाणी वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, ते कधी येतात अन् कधी जातात याचा पत्ताच लागत नाही, असे खुद्द प्रवाशांतून सांगण्यात आले. दिवसभरात सर्वच आगाराच्या १५ ते २० बसेस येथून ये-जा करतात. यातील बहुतांश बसेसची दुरवस्था झाल्याचे दिसून येतात. विशेषत: उमरगा, औसा, तुळजापूर आणि उस्मानाबाद आगाराच्या गाड्यांची अवस्था दयनीय असते. ग्रामीण भागात जाणार्या या बसगाडीमध्ये बसल्यानंतर प्रवासी प्रवास करतात तरी कसे असा सवाल पडल्याशिवाय राहत नाही. प्रवाशांसाठी असलेली आसनव्यवस्था ही वपराबाहेर गेल्याचे दिसते. तसेच पत्राही जागोजागी तुटलेल्या अवस्थते असल्याने बस सुरू झाली की, त्याचा आवाज सुरू होतो. खिडक्यांच्या काचांचही यापेक्षा काही वेगळी स्थिती नसते. एकेका खिडकीला तर काचाच नसतात. ज्या असतात, त्यांचे पॅकिंग तुटल्यामुळे कर्कश आवाजामध्ये जास्तीची भर पडते. या सर्व बाबी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतात. गाव कधी येईल, याचीच वाट प्रवाशी बघत असतात. हे चित्र बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर) लोहारा येथे येणार्या बसलेले फलक असतात. परंतु, बसप्रमाणेच फलकांचीही अवस्था झालेली आहे. अनेक गाड्यांचे फलक अस्पष्ट असतात. त्यामुळे प्रवाशांना सदरील गाडी कोठे जात आहे, हे लवकर लक्षात येत नाही. अनेक बसेसच्या खिडक्यांच्या काचा गायब झालेल्या असतात. विशेष म्हणजे काही बसेसच्या समोरील काचाही फुटल्याचे दिसून येते. असे असतानाही त्याच्या दुरूस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. बसेसला लाईटची सोय असली तरी साईड बल्ब बंदच असतात. तर काही बसेसचे इंडीकेटर तुटलेल्या अवस्थेत दिसून येतात. अशा बसेस चालविताना विशेषत: रात्रीच्या वेळी चालकांना दोरीवरची कसरत करावी लागते. प्रवासी-वाहकांतही उडतात खटके उस्मानाबाद येथून लोहारा येथे जाण्यासाठी दर एक तासाला बस आहे. परंतु, या मार्गावर सोडण्यात येणार्या बहुतांश बसेस खराब असतात. नाव न छापण्याच्या अटीवर एक चालक सांगातात...उस्मानाबादहून लोहार्याकडे बस निघाल्यानंतर खराब रस्त्यामुळे प्रचंड कसरत करावी लागते. बसेसची अवस्था दयनीय असल्यामुळे ही बस लोहार्यात जाईपर्यंत जिवात जीव नसतो. कधी बस पंक्चर होते तर कधी ब्रेक फेल. पावसाळ्यात तर गळक्या बसेस दिल्या जातात. अशा वेळी प्रवाशांचेही बोल ऐकून घ्यावे लागतात. अनेकवेळा प्रवासी आणि वाहकांत खटकेही उडतात. त्यामुळे अशा बसगाड्या घेऊन जाणेही अगदी जिवावर येते. भंगार गाड्यांमुळे आर्थिक फटका परंडा : उत्पन्न वाढ, विनाअपघात सेवा, उत्कृष्ट कॅपिटल, अशा सर्वच बाबतीत एकेकाळी आघाडीवर असलेल्या या आगाराचा कारभार सद्यस्थितीत मात्र जुनाट गाड्यांच्या भरवशावर चालू असून, यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पूर्वी लग्नाचे वºहाड नेण्यासाठी बसगाड्यांना मोठी मागणी होती. परंतु, खराब बसगाड्यांमुळे वधू-पितेही आता या गाड्यांकडे पाठ फिरवित असल्याचे दिसत आहे. येथे जवळपास २३ मोठ्या २ मिनी बसेस आहेत. त्यापैकी निम्म्या गाड्या जुनाट आहेत. अनेक गाड्यांच्या खिडक्यांची तावदाने वारंवार तुटत असून, आसनांचीही दुरवस्था झाल्याचे दिसते. शिवाय, मार्गात वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांना वाटेतच थांबून दुसर्या वाहनाची वाट पाहण्याचे प्रसंगही वारंवार अनुभवास मिळत आहेत. आगारात बॉडी फिटर नसल्याने बसच्या बॅडीची कामे वेळेत होत नाही. त्यामुळे गाड्या खिळखिळ्या होऊन अनेक समस्या निर्माण होत आहेत. येथे यांत्रिक कामगारांची संख्या अपुरी असल्याने, गाड्यांच्या दुरुस्तीलाही वेळ लागत असल्याचे दिसते. (वार्ताहर) दुरुस्ती आवश्यक तुटलेल्या खिडक्या, निखळलेल्या काचा, उखडलेले पत्रे आणि गळक्या बसेस, अशी परिस्थिती परंडा आगारातील बसेसची झाली आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यासाठी महामंडळाने जून महिन्यापूर्वी खिडक्यांच्या काचा, वायपर मोटार, आर्म ब्लेड्स आदींच्या दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.