उपक्रमांचा सुकाळ; डॉक्टरांचा दुष्काळ !
By Admin | Updated: September 25, 2014 00:53 IST2014-09-25T00:42:33+5:302014-09-25T00:53:49+5:30
उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २७ योजना, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नियमित आरोग्य सेवा पुरविणेही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे.

उपक्रमांचा सुकाळ; डॉक्टरांचा दुष्काळ !
उस्मानाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या २७ योजना, उपक्रम राबविले जात आहेत. तसेच नियमित आरोग्य सेवा पुरविणेही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र वर्ष-वर्ष डॉक्टरांची पदे भरली जात नाहीत. कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. एकूणच हे चित्र पाहिल्यानंतर उपक्रमांचा सुकाळ तर डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा दुष्काळ असल्याचे समोर येते. याचा फटका रुग्णसेवेसोबतच उपक्रमांनाही बसत आहे.
जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या ४२ च्या आसपास आहे. तर उपकेंद्राचा आकडा याच्या दुप्पट आहे. या आरोग्य केंद्रासाठी किमान ८४ डॉक्टरांचा आवश्यकता आहे. मात्र एखादे पद रिक्त झाल्यानंतर ते वेळेवर भरले जात नाही. त्यामुळेच रिक्त पदांचा आकडा महिन्यागणिक वाढत चालला आहे. आजघडीला ५० टक्केही डॉक्टर कार्यरत नाहीत. हीच अवस्था अन्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोमात गेली की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याचा फटका निश्चितच खेडोपाड्यातील सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. तसेच विविध उपक्रम आणि योजनाही पूर्ण क्षमतेने राबल्या जात नाहीत.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, माता मृत्यू आढावा, बाल आरोग्य, बालस्वास्थ्य कार्यक्रम, नवसंजीवन योजना, नियमित लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, अर्श, गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, कायदा १९९४, वैद्यकीय गर्भपात कायदा, प्रजनन व बाल आरोग्य प्रशिक्षण, नागरी आरसीएच कार्यक्रम, सहाय्यक अनुदान, मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, किमान गरजा कार्यक्रम, रुग्णालयीन सेवा, मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम १९९४, राष्ट्रीय मासिक आरोग्य कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मुलन आणि क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात. परंतु हे कार्यक्रम पूर्ण क्षमतेने राबविण्याइतकी प्रशासनाकडे क्षमता नाही. डॉक्टरांची पदे रिक्त असल्यामुळे नियमित आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. अनेकवेळा संतप्त ग्रामस्थ रुग्णालयाला ताळे ठोकत आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाच्या हाती काहीच उरले नसल्याने आश्वासने देण्यापलीकडे काहीच करता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा प्रश्न फारच गंभीर बनला आहे. त्यामुळेच मदर अँड चाईल्ड ट्रॅकींग सिस्टीमसारखा उपक्रम फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही. (प्रतिनिधी)