जि.प.मध्ये शिक्षकांच्या समायोजनात ‘शाळा’ !
By Admin | Updated: July 5, 2014 00:37 IST2014-07-05T00:22:39+5:302014-07-05T00:37:33+5:30
बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.
जि.प.मध्ये शिक्षकांच्या समायोजनात ‘शाळा’ !
बीड : जिल्हा परिषदेमध्ये आठवडाभरापूर्वी शिक्षकांची दर्जावाढ व समायोजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र समुपदेशानुसार झालेल्या समायोजनात ‘शाळा’ झाल्याची बाब आता पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. एकाच जागेवर दोन- दोन शिक्षकांना रूजू आदेश गेल्यामुळे समुपदेशनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महत्वाचे म्हणजे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली असून रूजू कोणाला करून घ्यायचे याचा पेच निर्माण झाला आहे.
बारावी डी.एड. या शैक्षणिक अर्हतेवर सहशिक्षक म्हणून नियुक्त्या मिळालेल्या अनेक शिक्षकांनी पदवी प्राप्त केली. प्राथमिक पदवीधर ही पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे पदवी प्राप्त करणाऱ्या शिक्षकांना प्राथमिक पदवीधर या पदावर दर्जावाढ देण्यात आली. जवळपास एक हजार शिक्षकांना दर्जावाढ बहाल केल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तालुकानिहाय समायोजन जि.प.च्या सभागृहात पार पडले. जिल्ह्यात अतिरिक्त असलेल्या १३४ शिक्षकांना समायोजनात प्राधान्य देण्यात आले. मात्र समायोजना दरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. समायोजन समुपदेशनानुसार व पारदर्शक पद्धतीने सुरु असल्याचे चित्र निर्माण केले खरे परंतु एका जागेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांचे स्वतंत्र नियुक्ती आदेश गेल्याने समुपदेशन कसे झाले हे स्पष्ट होत आहे.
धारूर तालुक्यातील आसरडोह येथे मच्छिंद्र पंडित सोळंके हे शिक्षक जावक क्र. ५१४९ या आदेशाने रूजू होण्यासाठी गेले. तर त्यांच्या आधीच त्याच जागेवर अनिल पांडुरंग सारडा हे जावक क्र.५८४१ नुसार रूजूही झाले. एकाच जागेसाठी दोन रूजू अर्ज गेल्याचे हे प्राथमिक उदाहरण आहे. मात्र बीड, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा या तालुक्यांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बीड तालुक्यातील पाली येथे देखील एका शिक्षिकेसह शिक्षकाला स्वतंत्र रूजू आदेश आहेत.
अतिरिक्त शिक्षकांचा तिढा कायम
दरम्यान, समायोजनात झालेल्या या गोंधळामुळे अतिरिक्त शिक्षकांचा तिढा कायम राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कारण जिल्ह्यात पूर्वीचेच १३४ अतिरिक्त शिक्षक आहेत. या शिवाय आंतरजिल्हा बदलीने दीडशेहून अधिक शिक्षक जिल्ह्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न काय राहील, अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)
दुरूस्ती करू- जवळेकर
याबाबत सीईओ राजीव जवळेकर म्हणाले, एकाच जागेसाठी दोन अर्ज कसे गेले याची माहिती घेतली जाईल. तसे असेल तर दुरूस्ती करण्यात येईल. मात्र दर्जावाढ, समायोजनामुळे रिक्त जागा भरल्या असून अतिरिक्त शिक्षकांचाही प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे.
तालुक्याबाहेरील शिक्षकांना थारा नाही- क्षीरसागर
सभापती संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की, काही आदेश परस्पर निघाले असावेत. तालुक्याबाहेरील शिक्षकांना मुख्याध्यापकांनी रूजू करून घेऊ नये. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशांनाच अधिकृत समजावे. परस्पर आदेश काढल्याचे निदर्शनास आले तर गय नाही, असा इशारा त्यांनी दिला.