बाळासाहेब जाधव , लातूरगेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यावर अवर्षणाचे ढग दाटून राहिल्याने त्याचा परिणाम स्वच्छता अभियानावरही झाला आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यास देण्यात आलेले शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट अडीच महिन्यानंतरही १० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाची यावेळी पाणीटंचाईने मोठीच गोची केली आहे. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या आर्थिक वर्षात शौचालय बांधकामात लातूर जिल्हा परिषद राज्यात पहिल्या तीनमध्ये होती. गतवेळी २१ हजार ५५४ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट जिल्ह्यास देण्यात आले होते. परंतु, त्याहून चार हजार अधिक शौचालये बांधण्यात आली. जवळपास १२० टक्के उद्दिष्ट जिल्हा परिषदेने गाठले होते. या कामामुळे लातूर जिल्हा परिषद राज्यात तिसरी, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर राहिली. दरम्यान, एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास ३६ हजार ३३ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी लातूर तालुक्यास २७८०, औसा २९१९, निलंगा ३०६६, शिरूर अनंतपाळ ३१८३, देवणी १७८२, उदगीर १२०६२, जळकोट २१४२, अहमदपूर २५११, चाकूर २९९०, तर रेणापूर तालुक्यास २५९१ शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट आहे. परंतु, या कामावर यंदा पाणीटंचाईचे सावट राहिले. गावोगाव पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने बांधकामांवर परिणाम झाला. शिवाय, दोन महिने लोकसभा निवडणूक प्रक्रियेत गेल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पाठपुरावाही कमी राहिला. त्याचा परिणाम अभियानावर होऊन अडीच महिन्यांत उद्दिष्ट १० टक्क्यांच्या आतच राहिले आहे. एप्रिल, मे महिन्यात २३१० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. शिवाय, जवळपास दोन हजार शौचालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. पहिल्या तिमाहीतील बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता जिल्हा परिषदेला स्वच्छता अभियानात मोठा वेग घ्यावा लागणार आहे. अनुदान बँक खात्यावर...एखाद्या कुटुंबाने शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून त्याचा प्रस्ताव ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीकडे सादर केल्यास त्याची पाहणी करून कुटुंबप्रमुखास ४६०० रुपये अनुदान देण्यात येत आहे. दरम्यान, हे अनुदान कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यावरच जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर उदगीर व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लाभार्थ्यांना बँक खात्यावर अनुदान देण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांत त्याच पद्धतीने अनुदान वाटप होणार आहे. दोन महिन्यांत गावे हागणदारीमुक्त...गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत शौचालयासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली़ पाण्याच्या टंचाईमुळे शौचालयांची कामे काही प्रमाणात रखडली आहेत; परंतु जिल्यातील ५२ गावांतील शौचालयांची कामे १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़पाणीटंचाईचा परिणाम... गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीटंचाईचे सावट जिल्ह्यावर राहिले आहे. त्यामुळे बांधकामावर परिणाम झाला. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात अधिकारी राहिल्याने शौचालयाच्या कामाला खिळ बसली. परिणामी, उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. एप्रिल, मे या दोन महिन्यांत केवळ २ हजार ३१० शौचालयाचे बांधकाम झाले आहेत. केवळ १० टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आता उद्दिष्टपूर्तीसाठी सरसावली आहे. दोन महिन्यांत गावे हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे.
स्वच्छता अभियानाला टंचाईचा ब्रेक
By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST