साताऱ्यात निर्जळी...!
By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-29T00:51:27+5:302014-07-29T01:13:55+5:30
औरंगाबाद : सातारा परिसरातील शेंद्रा येथील पाणीपुरवठ्याचा पॉइंट बदलून दोन दिवसांपासून नक्षत्रवाडी येथून शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता.
साताऱ्यात निर्जळी...!
औरंगाबाद : सातारा परिसरातील शेंद्रा येथील पाणीपुरवठ्याचा पॉइंट बदलून दोन दिवसांपासून नक्षत्रवाडी येथून शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. कालपासून मोटारीत बिघाड झाल्यामुळे पाण्यासाठी टँकरच्या रांगा लागल्या असून, ईद खाजगी टँकरच्या पाण्यावरच साजरी करण्याची वेळ आली आहे.
नक्षत्रवाडीच्या पॉइंटवर झालेला बिघाड दुरुस्त होईपर्यंत किमान शेंद्रा परिसरातून पूर्ववत टँकर सुरू ठेवण्याची आवश्यकता होती; परंतु गटविकास अधिकारी व तहसीलदारांनीही या बाबीची दखल घेतलेली नाही. त्यामुळे सातारा व देवळाई परिसरातील नागरिकांना खाजगी टँकरच्या पाण्यावरच ईद साजरी करावी लागणार आहे.
मुळात सातारा व देवळाईला शेंद्रा येथून येणाऱ्या टँकरमुळे दिवसात दोन फेऱ्या होत आहेत, असे नागरिकांनी ओरड केल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही नक्षत्रवाडी येथील मनपाच्या जलवाहिनीवरून पाणी भरण्यासाठी पॉइंट काढून सातारा- देवळाईला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ऐन सणाच्या तोंडावर पाणीटंचाईची समस्या बिकट झाली आहे.
मनपाच्या अधिकाऱ्यांकडे सरपंच तथा पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की, दोन दिवसांपासून टँकर रिकामेच पाण्याच्या प्रतीक्षेत असून, सणही पाण्याविना साजरा करावा लागतो की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी ओरड राहुल शिरसाट, सोमीनाथ शिराणे, राहुल शिंदे, विठ्ठल काळे आदींनी केली आहे.
काय आहे स्थिती?
टँकरची संख्या १३
अंतराच्या प्रश्नांवरून टँकरचा चक्काजाम
अधिकाऱ्यांंना कळूनही दुर्लक्ष
ईदच्या सणाला खाजगी टँकर बोलविण्याची नामुष्की
सदस्यांना नागरिकांनी धारेवर धरले
अधिकाऱ्यांना सदस्य व नागरिक घालणार घेराव