मराठवाड्यात टँकरने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:04 IST2018-01-31T00:04:19+5:302018-01-31T00:04:27+5:30
मराठवाड्यात जानेवारीअखेरीस टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील ८६ गावांमध्ये १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फेबु्रवारीनंतर टँकर संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात टँकरने गाठली शंभरी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यात जानेवारीअखेरीस टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे, मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यांतील ८६ गावांमध्ये १०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फेबु्रवारीनंतर टँकर संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
टंचाईच्या झळा औरंगाबाद जिल्ह्याला बसत असून, औरंगाबाद, गंगापूर, फुलंब्री, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड या ७ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूआहे.
जिल्ह्यातील ७८ गावांमधील तब्बल १ लाख ७५ हजार नागरिकांची तहान ८९ टँकरद्वारे भागविण्यात येत आहे. औरंगाबादसह परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कमी पाऊस झाला. त्या जिल्ह्यांत येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. टँकर वाढविण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत.
जालना जिल्ह्यात ९८ टक्के पाऊस झाला, तरी भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्या तालुक्यातील चार गावांमधील १२ हजार नागरिकांना ६ टँकरने पाणी दिले जात आहे. नांदेड जिल्ह्याच्या विविध भागांत ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकर सुरू असलेले
गावे, लोकसंख्या
तालुका गावे लोकसंख्या टँकर
औरंगाबाद ३ ६३४८ ४
फुलंब्री २० ५३२१० २९
गंगापूर ४२ १०२६५२ ४६
वैजापूर ४ ११०१ ४
खुलताबाद ४ ५२७६ ३
सिल्लोड ३ ४५२८ ३
भोकरदन ३ ११२४१ ५
जाफराबाद १ ८८२ १
नांदेड ५ ११०० ५