समान पाणीटंचाई धोरणात लातूर जिल्ह्याला टँकर कमीच !

By Admin | Updated: September 3, 2015 00:29 IST2015-09-03T00:26:21+5:302015-09-03T00:29:56+5:30

लातूर/औसा : प्रत्येक जिल्ह्यात समान पाणीटंचाईचा निकष लावला असल्याचा दावा शासन करीत असले तरी बीडला ७०० टँकर, उस्मानाबादला ५०० टँकर मंजूर केले आहेत.

In the same water scarcity policy, the tanker in Latur district is rare! | समान पाणीटंचाई धोरणात लातूर जिल्ह्याला टँकर कमीच !

समान पाणीटंचाई धोरणात लातूर जिल्ह्याला टँकर कमीच !


लातूर/औसा : प्रत्येक जिल्ह्यात समान पाणीटंचाईचा निकष लावला असल्याचा दावा शासन करीत असले तरी बीडला ७०० टँकर, उस्मानाबादला ५०० टँकर मंजूर केले आहेत. मात्र २४ लाख लोकसंख्या असलेल्या लातूर जिल्ह्यात केवळ ११२ टँकर आहेत़ समान टंचाई धोरणात लातूरवर अन्याय का, असा प्रश्न लोकप्रतिनिधींसह नागरिक उपस्थित करीत आहेत़ मुख्यमंत्र्यांसमोरही लातूरकरांनी नाराजी व्यक्त करुन टँकर वाढविण्याची मागणी केली आहे़
लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे भीषण टंचाईचा सामना लातूरकरांना करावा लागत आहे़ त्यामुळे टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, टँकर मंजुरीच्या प्रस्तावाला तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळत नाही़ सध्या जिल्ह्यात एकूण ५० गावांनी टँकरसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत़ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे हे प्रस्ताव जातात़ प्रस्ताव आलेल्या गावांची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाते़ मागणी झालेल्या गावाच्या परिसरात किमान दीड किलोमीटर अंतरावर पाण्याचा स्त्रोत नसेल तर त्या गावच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाते़ पाण्याचा स्त्रोत दीड कि़मी़ अंतरावर असेल तर टँकरला मंजुरी दिली जात नाही़ या अटीनुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अहवाल तहसीलदारांकडे जातो़ त्यानंतर तहसीलदार टँकरला परवानगी देतात़ हे प्रशासकीय नियम आहेत़ या नियमानुसारच सध्या टँकरला मंजुरी दिली जात आहे़ त्यामुळे लातूर जिल्ह्यात टँकरची संख्या कमी आहे़ शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यात ५०० टँकर तर बीड जिल्ह्यात ७०० टँकर आहेत़ आपल्याकडे मात्र ११२ टँकरने पाणीपुरवठा होत आहे़ महानगरपालिकेने स्वत:च्या अधिकारात ४६ टँकर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लावले आहेत़ (प्रतिनिधी)
लातूर जिल्ह्यात ९४२ अधिग्रहण करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ अधिग्रहण केलेल्या स्त्रोतांमध्ये पाणी आहे़ हे स्त्रोत गावांच्या दीड किलोमीटर अंतराच्या आत आहेत़ त्यामुळे टँकरची संख्या कमी आहे़ अधिग्रहणावर भागत नसेल तर टँकर हा पर्याय आहे़ सध्या अधिग्रहण केलेल्या ९४२ स्त्रोतातून पाणी मिळत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे़
कमी खर्च करुन दुष्काळाच्या परिस्थितीचे निवारण केले आणि शासनाचा खर्च वाचविला अशी पाठ थोपटून घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकारी टँकरला मंजुरी देत नाहीत, अशी तक्रार शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणे केली़ लातूर, बीडची दुष्काळी परिस्थिती सारखीच आहे़ परंतु, बीडला एक आणि लातूरला एक असा न्याय का असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला़ परंतु, मुख्यमंत्र्यांनी यावर काही भाष्य केले नाही़ परिणामी, दुजाभाव होत असल्याची भावना लातूरकरांची झाली आहे़
जिल्ह्यातील दहाही तालुक्यातून टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत़ मात्र या प्रस्तावाच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पाहणी होत नसल्याने ते प्रलंबित आहेत़ तहसीलदारांपर्यंत क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा अहवाल आला नसल्यामुळे संबंधीत गावांना टँकरची प्रतीक्षा आहे़

Web Title: In the same water scarcity policy, the tanker in Latur district is rare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.