पाऊस नसल्याने बळीराजा चिंतित
By Admin | Updated: June 19, 2014 00:16 IST2014-06-18T23:39:05+5:302014-06-19T00:16:48+5:30
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत.

पाऊस नसल्याने बळीराजा चिंतित
कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मान्सून सुरू होऊन आठवडा लोटला तरी अद्यापही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले आहे. असे असले तरी पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.
कोळगावसह परिसरातील काजळा, तांदळा, साठेवाडी, खडकी, टाकळगव्हाण, काळेवाडी, माणकापूर , सावरगाव या परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच नांगरणी, पाळी, मोगडा आदी कामे केली होती. तर १ जून लागताच अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदीही केली आहे. असे असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात असल्याचे अॅड. उद्धव रासकर यांनी सांगितले.
या परिसरातील शेतकऱ्यांनी शेत मशागतीसह बियाणांवर मोठा खर्च केला आहे. यामुळे वेळेवर पेरणी होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येते. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास उत्पादन चांगल्या प्रकारे होते. तसेच पिकांवर रोगराईही पडत नाही व दुबार पीक घेण्यास शेतकऱ्यांना सोपे जात असल्याचे पोखरी येथील सुनील धस यांनी सांगितले.
या परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन करण्यास शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी असल्यामुळे त्यांनी कपाशी लावलेली आहे. मात्र आता पाऊसच न पडल्याने विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे.सलग दोन वर्षांपासून या परिसरात उशिराने पाऊस पडत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. या वर्षीही वेळेवर पाऊस न पडल्यास पेरणीसाठी अडचण येईल, असे शेतकरी बाळू जोगदंड म्हणाले. (वार्ताहर)
ठिबक सिंचन केलेले शेतकरीही अडचणीत
कोळगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशी लावली आहे. पाऊस न पडल्याने हे शेतकरीही अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.
मशागती पूर्ण झाल्या असतानाही पावसाअभावी पेरण्या रखडल्या.
वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता.