ग्रामीण भागातील स्थलांतर रोखणार
By Admin | Updated: August 13, 2015 00:21 IST2015-08-13T00:05:06+5:302015-08-13T00:21:41+5:30
जालना : पाऊस सुरू झाला असला तरी दुष्काळ संपला नाही. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी कामाची मागणी झाल्यानंतर पंधरा दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करू दिली जातील,

ग्रामीण भागातील स्थलांतर रोखणार
जालना : पाऊस सुरू झाला असला तरी दुष्काळ संपला नाही. ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी कामाची मागणी झाल्यानंतर पंधरा दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत कामे उपलब्ध करू दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
जालना जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दुष्काळग्रस्त, गारपीटग्रस्त आदींसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. बँकांकडे उपलब्ध असलेल्या कमी मनुष्यबळाच्या आधारे मदतीचे वाटप सुरू आहे. यामध्ये काही अडचणी असून, विलंबाने का होईना, प्रत्येक लाभार्थीला ही मदत मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने ही बँक १३० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करू शकली नसल्याचे मान्य करीत ९०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला होते. पैकी ६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, जालना जिल्हा प्रशासनाने चारा उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल पाठविल्याने जालन्याला चारा छावणी मंजूर होऊ शकली नाही.
यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत आपण हा मुद्दा लावून धरल्यानंतर जालना जिल्ह्यातील वस्तुस्थिती आणि जिल्हा प्रशासनाचा अहवाल याचा अभ्यास करण्याबाबत आपल्याला सांगण्यात आले. अहवाल आल्यानंतर जालना जिल्ह्यात चारा छावणी सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकेल, असे लोणीकर म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)