आसूड बैलांवर नव्हे, सरकारवर चालवा
By Admin | Updated: April 15, 2017 00:28 IST2017-04-15T00:23:28+5:302017-04-15T00:28:17+5:30
उस्मानाबाद :सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़

आसूड बैलांवर नव्हे, सरकारवर चालवा
उस्मानाबाद : कर्जमाफी केल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत, याची हमी मुख्यमंत्री मागत आहेत़ मात्र, नोकरदारांना सातवा वेतन आयोग लागू केल्यावर भ्रष्टाचार होणार नाही, याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली होती का ? असा सवाल करीत सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांच्या विरोधात असून, शेतकऱ्यांचा आसूड बैलावर नाही तर सरकारवर चालविला पाहिजे, असे प्रतिपादन आ़ बच्चू कडू यांनी केले़
शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, दिव्यांग, विधवा आणि सैनिकांच्या हक्कासाठी ‘सीएम टू पीएम’ शेतकरी आसूड यात्रा काढण्यात आली आहे. सदरील यात्रा ११ एप्रिलपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापासून सुरु करण्यात आली असून, २१ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात येथील वडनगर मधील घरावर जाणार आहे. ही यात्रा शुक्रवारी उस्मानाबाद शहरात दाखल झाली़ या यात्रेचे शहरात स्वागत करण्यात आले़ त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ़ कडू बोलत होते़ यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, चंद्रकांत जाधव आदींची उपस्थिती होती़
आ़ कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ ही साधी बाब नाही. सरकारची शेतकऱ्यांविषयींची मानसिकता काय आहे, हे तपासण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळावेत, सरकार चालविणाऱ्यांना जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी ही आसूड यात्रा काढल्याचेही ते म्हणाले़ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यकर्त्यांना तरीही शरम नाही़ निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने वाऱ्यावर सोडली आहेत. हे शासन येवून तीन वर्षे झाली मात्र अधिकाऱ्यांच्या तोंडून नेते आजही बोलत आहेत. त्यामुळे या विरोधात ही आमची लढाई आहे. शासनाने शेतकरी, कष्टकरी जनतेचे प्रश्न नाही सोडविले तर ही जनता त्यांना गावात फिरकू देणार नाही, असे पाटील म्हणाले़ (प्रतिनिधी)