जिल्ह्यात वाळू माफियांचे राज
By Admin | Updated: June 2, 2014 01:05 IST2014-06-02T01:03:17+5:302014-06-02T01:05:31+5:30
अनुराग पोवळे , खुद्द जिल्हाधिकार्यांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी बिलोलीचे तहसीलदार राजकुमार माने यांच्यासह त्यांचे मंडळ अधिकारी आणि तलाठ्यास मारहाण केल्याची घटना घडली़

जिल्ह्यात वाळू माफियांचे राज
अनुराग पोवळे , नांदेड जिल्ह्यात सध्या वाळू माफियांचेच राज्य असल्याचे स्पष्ट होत असून काही दिवसांपूर्वी खुद्द जिल्हाधिकार्यांच्या वाहनावर दगडफेक केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी बिलोलीचे तहसीलदार राजकुमार माने यांच्यासह त्यांचे मंडळ अधिकारी आणि तलाठ्यास मारहाण केल्याची घटना घडली़ हे दोन्ही प्रकार अवैध गौण खनीज वाहतुकीविरूध्द कारवाई करताना घडले आहेत़ या हिंसक घटनाच्या निषेधार्थ २ जून पासून तहसिलदारांसह अन्य महसूल कर्मचारी काम बंद आदंोलन करणार आहेत़ जिल्ह्यात राजकीय पाठबळाच्या आधारे वाळू माफियांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे़ जागोजागी पर्यावरणाच्या नियमांची उघडपणे पायपल्ली करीत आणि जिल्हा प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे़ हा वाळू उपसा परवानगी दिलेल्या ठिकाणावरूनही होत आहे आणि परवानगी नसलेल्या ठिकाणावरूनही होत आहे़ गौण खनिज प्रकरणात जिल्ह्यात कुठे कारवाई झाली तर ती कारवाई मंत्रालयस्तरावरून स्थगीत करण्याचे प्रकार दोन वर्षापासून सुरू आहेत़ परिणामी जिल्हा प्रशासनातील अधिकारीही गौण खनिजाकडे कानाडोळा करीत आहेत़ त्यात एखाद्या ठिकाणी कारवाई होत असल्यास वाळू माफिया थेट अधिकारी कर्मचार्यांवर जीवघेणा हल्ला करीत आहेत़ असाच प्रकार ३० मे २०१४ रोजी संध्याकाळी घडला़ बिलोलीचे तहसीलदार राजकुमार माने हे त्यांचे मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांसह अवैध गौण खनिज वाहतुकीविरूध्द कारवाई करत असताना नंदू गाडे व संजय लालबाजी अटकोरे यांनी नरसी देगलूर रस्त्यावर आदमपूर फाट्याजवळ लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली़ त्या दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ वाळू माफियांकडून तहसीलदारांचे असे हाल होत असतील तर अन्य महसूल कर्मचार्यांची काय अवस्था असेल हा प्रश्न पुढे येत आहे़ या घटनेचा राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे़ जिल्ह्यातील हिंसक घटनांमुळे अवैध गौण खनीज वाहतुकीविरूध्द कारवाई करण्यासाठी महसूल अधिकारी व कर्मचारी धजावत नाहीत, त्यांचे मनोधैर्य खचले आहे़ महसूल अधिकार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे पोलिस बंदोबस्ताशिवाय गौण खनीज विषयातील कामे केल्या जाणार नाहीत याची शासनाने नोंद घ्यावी असेही महसूल अधिकारी-कर्मचार्यांनी स्पष्ट केले आह़े बिलोली घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि महसूल कर्मचार्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महसूल अधिकारी, कर्मचारी, तलाठी, चतुर्थ श्रेणी, कर्मचारी २ जूनपासून सुरू होणार्या काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत़ महसूल कर्मचार्यांच्या या मागण्यांना उपजिल्हाधिकारी ए़बी़ पिनाटे, पुरवठा अधिकारी भागवत देशमुख, नांदेडचे तहसीलदार महादेव किरवले, नायब तहसीलदार विजय चव्हाण, धर्माबादचे तहसीलदार राजभाऊ कदम, नायगाव तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुखेड तहसीलदार एस़पी़ घोळवे, बिलोली तहसीलदार राजकुमार माने, किनवट तहसीलदार शिवाजी राठोड आदींनी पाठींबा दिला आहे़ जिल्हाधिकार्याच्या वाहनावर झाली होती दगडफेक जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी ७ मार्च रोजी बिलोली तालुक्यातील सगरोळी आणि येसगी घाटाची पाहणी केली होती़ या पाहणीदरम्यान वाळूूमाफियांनी जिल्हाधिकार्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती़ येथील वाळू ठेकेदारांना २२ कोटींचा दंड जिल्हाधिकार्यांनी ठोठावला आहे़ या कारवाईस महसूल मंत्र्यानी स्थगिती दिली आहे़ जिल्ह्यातील राजकिय पदाधिकार्यांच्या दबावातून ही स्थगिती मिळाल्याचेही सांगितले जात आहे़ या आहेत मागण्या़़़ जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयात कायमस्वरूपी एक हत्यारी गार्ड पुरवावा, अवैध गौण खनिज वाहतुकीविरूध्द कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकात एक हत्यारी अधिकारी, दोन हत्यारबंद पोलिस कर्मचारी देण्यात यावेत, लोकसभा निवडणुकीच्या धरतीवर प्रत्येक तालुक्यात आवश्यक त्या पोलिस बंदोबस्तासह चेकपोस्ट निर्माण करावेत, प्रत्येक चेकपोस्टवर अवैध गौण गनीज वाहतूक करणारे वाहनाविरूध्द ओव्हर लोडिंगची कारवाई करण्यासाठी दिवसातून दोन वेळा आरटीओंनी वाहनांची तपासणी करावी, बिलोली प्रकरणातील आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्याखाली गुन्हा दाखल करावा. कारवाई करण्यासाठी जाताना आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त मिळाल्याशिवाय कोणताही महसूल अधिकारी, कर्मचारी कारवाई करणार नाही, पोलिस बंदोबस्ताअभावी कारवाई न केल्यामुळे महसूल अधिकार्यांना दोषी ठरवू नये अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे़ जमावबंदी आदेशाची अंमलबजावणीच नाही़़ जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रेतीघाटांवर जिल्हा प्रशासनाने कलम १४४ आदेश लागू केले आहे़ रेतीघाटांवर हे कलम लागू केल्यामुळे तरी अवैध वाळू उपसा थांबेल अशी प्रशासनाची अपेक्षा होती़ प्रत्यक्षात ज्यांच्यावर या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे, त्यांनी अर्थात तहसीलदारांनीच जिल्ह्यातील एकाही रेती घाटावर या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे जिल्हाधिकार्यांपुढेच सांगितले आहे़ पोलिस यंत्रणेकडून कलम १४४ चे उल्लंघन झाल्याप्रकरणी एकाही वाळू घाटावर कारवाई झाली नसल्याचे सांगितले आहे़ अशी कारवाई झाली नसल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाल्याचे तहसीलदारांनी म्हटले आहे़ त्यामुळे वाळूघाटांवर सध्या काय परिस्थिती आहे याचा अंदाज स्पष्टपणे लावता येतो़ पोलिस बंदोबस्त देण्यासाठी कधीही तयार- दहिया वाळू घाटांवर अवैधरित्या होणारे उत्खनन थांबविण्यासाठी महसूल विभागाकडून होणार्या कारवाईदरम्यान पोलिसांचा बंदोबस्त नेहमीच देण्यात येईल असे जिल्हा पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी स्पष्ट केले़ गौण खनिजाचा अवैधरित्या होणारा उपसा रोखण्यासाठी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक परभणीसह अन्य काही ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे़ असे पथक जिल्ह्यात स्थापन केल्यास सुरक्षेसाठी पोलिस कधीही तयार आहेत़ त्याचवेळी कोणत्याही कारवाईदरम्यान माहिती दिल्यास पोलिस प्रशासन महसूल विभागाला आवश्यक ती मदत देईलच़ वाळूघाटावरील जमावबंदी आदेशाच्या अंमलबजावणीत महसूल विभागासोबत पोलिस कारवाई करू शकतील असेही पोलिस अधीक्षक दहिया यांनी स्पष्ट केले़