आरटीओ कार्यालय बेभरोसे
By Admin | Updated: February 9, 2015 00:46 IST2015-02-09T00:26:32+5:302015-02-09T00:46:12+5:30
सोमनाथ खताळ , बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे. कोणीही या अन् खुशाल हवी ती कागदपत्रे, साहित्य घेऊन जा

आरटीओ कार्यालय बेभरोसे
सोमनाथ खताळ , बीड
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे ‘आओ जाओ, घर तुम्हारा’ अशी स्थिती आहे. कोणीही या अन् खुशाल हवी ती कागदपत्रे, साहित्य घेऊन जा... अशी स्थिती आहे.हे कार्यालय आधीच चोरांच्या निशाण्यावर आहे. मात्र, अधिकारी ‘धडा’ घ्यायला तयार नाहीत. काम कमी अन् वसुली जादा या फंड्यामुळे कार्यालयाचा कारभार बेभरोसे असल्याचे धक्कादायक चित्र ‘लोकमत’ ने शनिवारी केलेल्या स्टींगमधून दिसून आले.
धुळे - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर नामलगाव फाट्याजवळ आरटीओ कार्यालय आहे. शहराबाहेर असलेल्या या कार्यालयाची सुरक्षितता अक्षरश: वाऱ्यावर आहे. तीन महिन्यांपूर्वी या कार्यालयात संगणक चोरीची घटना घडली होती. त्यापूर्वी देखील चोरांनी येथे हात साफ केला होता. सध्या शहरात भरदिवसा दरोडे पडत आहेत. डोळ्यात चटणी फेकून लाखो रूपये लुटले जात आहेत. चोर पकडताना पोलिसांची तारांबळ उडत असताना आरटीओ कार्यालयही चोरांना निमंत्रण देत आहे. रात्रीच्या वेळेस केवळ एकाच सुरक्षारक्षकावर येथील संपूर्ण सुरक्षा अवलंबून असते.
सुरक्षा पुरेशी
आरटीओ कार्यालयात दिवसभरातील कामाचा सर्व लेखाजोखा रात्रीच्यावेळी संगणकात एकत्र केला जातो. तो व्हीपीएन कनेक्शनने मुख्य कार्यालयाला पाठविला जातो. त्यामुळे आमचे काही महत्वाची कागदपत्रे जाणार नाहीत, याची आम्ही पूर्णत: काळजी घेतो. पूर्णपणे सुरक्षितता असल्याचा दावा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. खान यांनी व्यक्त केला.
शौचालयाचीही दुरवस्था
अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी साधे शौचालय देखील नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अधिकाऱ्यांसह वानचालक उघड्यावरच लघूशंका करतात. महिला कर्मचाऱ्यांची कुचंबणा होते. येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था केलेली नाही.
लोकमत चमूने शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कार्यालयात प्रवेश केला. यावेळी प्रवेशद्वाराजवळच संगणकावर काम सुरु होते. कार्यालयाला कुठेच सुरक्षाभिंत नाही. केवळ काट्या कुपाट्याच कार्यालयाची सुरक्षा करत आहेत. जुन्या वाहनांचा खच आहे. या वाहनांचे सुटे भागही जागेवर नस्सल्याचे दिसून आले. सर्वत्र उगावलेले गवत व केरकचरा अस्ताव्यस्त होता.