रोटेगावचे रेल्वेस्थानक दलालांच्या विळख्यात !

By Admin | Updated: May 22, 2014 00:54 IST2014-05-22T00:37:27+5:302014-05-22T00:54:57+5:30

विजय गायकवाड , वैजापूर वैजापूर शहरानजीक असलेल्या रोटेगाव रेल्वे स्टेशनवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Rotegaon railway station brothels know! | रोटेगावचे रेल्वेस्थानक दलालांच्या विळख्यात !

रोटेगावचे रेल्वेस्थानक दलालांच्या विळख्यात !

विजय गायकवाड , वैजापूर वैजापूर शहरानजीक असलेल्या रोटेगाव रेल्वे स्टेशनवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्टेशनचा दर्शनी भाग व तिकीट खिडकीजवळील भिंती गुटख्याच्या पिचकार्‍यांनी रंगल्या आहेत. स्टेशन परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांना नाक मुठीत धरून रेल्वेयात्रा करावी लागत आहे. तसेच हे रेल्वेस्थानक दलालांच्या विळख्यात सापडल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. रोटेगाव येथील जुन्या रेल्वेस्थानकात स्वच्छता व सोयी-सुविधांबाबत आनंदीआनंदच होता. आता नवीन झालेल्या स्थानकातही साफसफाईच्या नावाने बोंबाबोंबच आहे. स्थानकात नित्यनेमाने साफसफाई केली जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हे घाणेरडे व किळसवाणे चित्र प्रवाशांना पाहावयास मिळत आहे. याशिवाय स्थानकात केरकचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. रेल्वेचा प्रवास स्वस्त असल्याने प्रवाशांची संख्या जास्त आहे; परंतु रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी व ढिसाळ कारभाराने कळस गाठला आहे. त्यांच्या या तुघलकी कारभाराचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. येथील रेल्वे कर्मचार्‍यांच्या दादागिरीवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा वचक आहे ना लोकप्रतिनिधींचा. रेल्वे कर्मचार्‍यांच्या या वाढत्या दादागिरीला तात्काळ लगाम बसणे गरजेचे आहे.स्टेशनच्या कर्मचार्‍यांची दादागिरी वाढल्याने सामान्य प्रवाशांवर दहशत बसली आहे. सामान्य प्रवासी काही विचारणा करण्यास गेल्यास स्टेशनमास्तर व अन्य कर्मचारी व्यवस्थित माहिती न देता प्रवाशांना उद्धटपणाची वागणूक देतात. त्यामुळे स्थानकात माहिती विचारण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना हतबल होऊन परतावे लागते. त्यांची ही दादागिरी अनेक दिवसांपासून अशीच सुरू आहे. स्थानकातील प्रतीक्षालयाची दुरवस्था झाली असून, ते नियमितपणे उघडले जात नसल्याने प्रतीक्षालयात घाण दर्प येतो. विशेषत: प्रतीक्षालयातील शौचालयाची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने त्यात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रतीक्षालयात थांबणे कठीण झाले. प्रतीक्षालय बांधले खरे; परंतु या प्रतीक्षालयात पंखे बसविण्यात आले नाहीत. सध्या सूर्य आग ओकत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांनी प्रतीक्षालयात थांबायचे कसे? यात थांबल्यास प्रवासी घामाघूम झाल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे प्रतीक्षालयाची स्वच्छता करून या ठिकाणी पंखे बसविणे गरजेचे आहे.रेल्वेची इमर्जन्सी प्रवासासाठी तत्काल योजना आहे; परंतु या योजनेच्या तिकिटांचा मोठा काळाबाजार स्थानकात चालतो. यासाठी सामान्य नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, तसेच पाहिले तर तत्कालचे तिकीट सामान्य नागरिकांना या स्थानकात मिळतच नाही. विशेष म्हणजे ही तिकीट खिडकी सकाळी १० वाजता उघडण्यापूर्वीच तिकिटे बुक झालेली असतात. कारण कर्मचार्‍याने दलालांशी अगोदरच संधान साधलेले असते. त्यामुळे तिकीट खिडकीवर रांगा लावून उभ्या असलेल्या प्रवाशांना तुमच्या अगोदर अन्य नंबर असल्याचे सांगून परतावून लावले जाते. तिकीट खिडकीतील हा कर्मचारी सूर्य (रवी) उगवण्यापूर्वीच ‘झिंगलेल्या’ अवस्थेत सर्वांच्या सेवेत दाखल होतो. झिंग असल्याने तो नेहमीच फौजदाराच्या भूमिकेत असतो. सामान्य प्रवाशांचे त्याच्यासमोर काही चालत नाही. तसा दमबाजी करायला हा कर्मचारी एकदम पटाईत. तत्कालच्या तिकिटांसाठी औरंगाबाद, नाशिक, मनमाड व येवला येथून दलाल येतात. याशिवाय स्थानिक दलालांचीही कमी नाही. तिकीट खिडकीचा कर्मचारी व या दलालांचे साटेलोटे आहे. तत्कालच्या तिकिटांच्या बदल्यात मोठी वरकमाई होते. तिकीट खिडकी म्हणजे खाती गव्हाण बनली आहे.नाशिक जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या दादागिरीमुळे वैजापूर व गंगापूर तालुक्याचे हक्काचे १०५४ दशलक्ष घनफूट पाणी पळविले गेले. दहा-बारा दिवसांपूर्वी ‘नांमका’चे पाणी बंद करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सचिव मालिनी शंकर यांच्यासह औरंगाबादचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व नांमकाच्या स्थानिक अधिकार्‍यांनी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करूनही पाणी सोडण्याबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. या पाणी प्रश्नात राज्यकर्ते अथवा स्थानिक पुढारी लक्ष घालायला तयार नाहीत. त्यामुळे तालुक्यातील लाभधारक शेतकरी हतबल झाले आहेत. परवा वैजापूर व कोपरगाव तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांनी नांमकाचे कार्यालय गाठून नांमकात पाणी न सोडल्यास नांमकाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. नांमकाचे हक्काचे पाणी मिळण्यासाठी सर्वपक्षीय पुढार्‍यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांचे मोठे जनआंदोलन उभारणे गरजेचे आहे.तालुक्यातील गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू आहे. ही वाळू तस्करी रोखण्यात महसूल प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. तालुक्यात वाळूतस्कर सक्रिय आहेच; परंतु या बरकतीच्या धंद्यात महसूल व पोलीस कर्मचार्‍यांनीही उड्या घेतल्या आहेत. या सरकारी तस्करांच्या पाठीवर त्यांच्याच वरिष्ठ अधिकार्‍यांचा वरदहस्त असल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. महसूल व पोलीस कर्मचारी कार्यालये सोडून ‘गोदावरी’त पोहोचल्याने त्यांच्या मुसक्या आवळायच्या कोणी, हाच खरा प्रश्न आहे. या सरकारी लुटारूंनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर वाहने घेऊन खुलेआमपणे गोदावरीची लूट सुरू केली आहे. दस्तूरखुद्द एका स्थानिक वरिष्ठ महसूल अधिकार्‍याच्या नातेवाईकाची ट्रक सुरू होती. पोलीस कर्मचार्‍यांनी दंडेलशाहीच्या जोरावर व महसूल विभागाचा कर्मचार्‍यांनी वरिष्ठांच्या आशीर्वादाने आपले उखळ पांढरे करून गोदावरी लुटण्याचा चंग बांधला आहे. अवजड वाहनातून वाळूची वाहतूक होत असल्याने गंगथडी भागातील रस्ते अक्षरश: मरणपंथाला लागले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांवर ‘नारायण-नारायण’ म्हणण्याची वेळ आली आहे.

Web Title: Rotegaon railway station brothels know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.