कॉलेजांत ‘रोमिओराज्य’!
By Admin | Updated: December 19, 2014 00:58 IST2014-12-19T00:38:43+5:302014-12-19T00:58:36+5:30
सोमनाथ खताळ , बीड ज्या युवकांचा महाविद्यालयात प्रवेश नाही, असे काही रोमिओ महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश करतात आणि विद्यार्थिनींची छेड काढतात.

कॉलेजांत ‘रोमिओराज्य’!
सोमनाथ खताळ , बीड
ज्या युवकांचा महाविद्यालयात प्रवेश नाही, असे काही रोमिओ महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून प्रवेश करतात आणि विद्यार्थिनींची छेड काढतात. याचे महाविद्यालयाला मात्र कुठलेही गांभीर्य नसून त्रास मात्र विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे. गुरूवारी शहरातील काही महाविद्यालयांमध्ये ‘लोकमत’ प्रतिनिधी धडकले;परंतु त्यांना ना कोणी हटकले ना कोणी ओळखपत्राची मागणी केली. ‘आओ जाओ कॉलेज तुम्हारा’ अशीच परिस्थिती कमी- अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले.
महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख पटावी, यासाठी ओळखपत्र अनिवार्य केलेले आहे. काही महाविद्यालयांनी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना ओखळपत्र तर वाटले;परंतु गळ्यात कार्ड लटकवून मिरवणे विद्यार्थ्यांना कमीपणाचे वाटते की काय माहीत नाही. बहुतांश विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांत ओळखपत्रांविनाच वावर आहे. उल्लेखनीय म्हणजे काही विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र नाही;परंतु महागडे मोबाईल मात्र दिसून आले. विद्यार्थ्यांऐवजी शिक्षक, प्राध्यापकांच्या गळ्यात मात्र ओळखपत्र असल्याचे दिसले.
कोठे काय आढळले?
दुपारी बारा वाजता केएसके महाविद्यालयात प्रवेश केला. यावेळी काही टवाळखोर प्रवेशद्वारासमोरच होते तर काही आत होते. या मुलांचा धिंगाणा सुरू होता, छेडछाडही सुरु होती. त्यांच्याकडे ओळखपत्रे नव्हती. सुरक्षा रक्षकानेही त्यांची साधी चौकशीही केली नाही.
प्रतिनिधी बनले विद्यार्थी
केएसके महाविद्यालयात दुपारच्यावेळेस थेट तिसऱ्या मजल्यावर चमुने प्रवेश केला. मात्र तिथपर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला कोणीच हटकले नाही. काही प्राध्यापक लोक गप्पा मारताना दिसून आले. एवढेच नाही तर वर्ग खोलीत जावून बसलो तरी कोणीसुद्धा आमच्याकडे लक्ष दिले नाही. यावरून महाविद्यालय किती सजग आहे, याची प्रचिती येते.
संभाजीराजे महाविद्यालय
शिवाजी नगर भागात असणाऱ्या संभाजीराजे महाविद्यालयात प्राध्यापकांच्या गळ्यात ओळखपत्र दिसून आले. तर विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र नव्हते. याच बिल्डींगमध्ये वसंतराव काळे पत्रकारीता महाविद्यालय आहे. येथेही यापेक्षा वेगळे पहावयास नाही मिळाले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
बार्शी रोडवर असणाऱ्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नक महाविद्यालयाला सुट्या असल्याचे सांगण्यात आले. येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक महिला सुरक्षा रक्षक होत्या.
आदित्य इंजिनीअरींग महाविद्यालय
तेलगाव नाक्यावरील आदीत्य इंजिनिअरींग महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अनेक मुले मुली कट्ट्यावर गप्पा मारताना दिसून आले. तर काही जण त्या मुलींकडे पाहून कॉमेंटस करत होते. सुरक्षा रक्षक गेटजवळ केवळ बघ्याची भूमिका घेत होते. या विद्यार्थ्यांना गणवेश होता. मात्र काही युवकांच्या वागण्यावरून ते तेथील विद्यार्थी नसावेत असा संशय व्यक्त करण्यात येत होता.
स्वा.सावरकर महाविद्यालय
शहरातील स्वा. सावरकर महाविद्यलयाला चमुने भेट दिली असता येथे काही मोजकेच विद्यार्थी हॉकीची प्रॅक्टीस करताना दिसून आले. यावेळी येथीलही विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र दिसून आले नाही. कॅम्पस पूर्ण शांत होता. येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
काय म्हणतात प्राचार्य ?
विद्यार्थिनींची छेड होऊ नये यासाठी आम्ही योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत़ वेळोवेळी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाते, असे बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सानप म्हणाले़ ओळखपत्र अनिवार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले़ संभाजीराजे संगणकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ नामदेव सानप यांनी सांगितले की, आम्ही महाविद्यालय आवारात सीसीटीव्ही बसविले आहेत़ त्यामुळे छेडछाड होते असे म्हणता येणार नाही़ विद्यार्थिनींच्या तक्रारींची आम्ही दखल घेतो़४
विद्यार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य असताना महाविद्यालयांचीच उदासीनता असल्याचे दिसून येते.
४काही महाविद्यालयांनी तर वर्ष उलटत आले तरी ओळखपत्र देण्याचीही तसदी घेतली नाही.
४त्यामुळे विद्यार्थी कोण अन् रोमिओ कोण? हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे.
४त्यामुळे विद्यार्थी भासवून रोमिओंचा मुक्त संचार आहे.
४काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत़
कर्मचाऱ्यांना दंड
४कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत वापरले नाही तर दंड आकारला जातो़ कर्मचाऱ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य केले तर रोमिओंच्या त्रासापासून मुली सुरक्षित राहतील.