रस्ते गुळगुळीत करणार
By Admin | Updated: June 27, 2016 01:08 IST2016-06-27T00:44:38+5:302016-06-27T01:08:21+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील काही प्रमुख रस्ते गुळगुळीत करून देण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे

रस्ते गुळगुळीत करणार
औरंगाबाद : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या औरंगाबाद शहरातील काही प्रमुख रस्ते गुळगुळीत करून देण्याची तयारी रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे. सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंतचे रस्ते महामंडळाने करून द्यावेत यासाठी मनपा प्रशासन तयारी करीत आहे. यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव लवकरच महामंडळाला सादर करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.
मागील २५ ते ३० वर्षांमध्ये महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांकडे फारसे लक्ष दिले नाही. दरवर्षी नगरसेवक आपल्याच वॉर्डातील रस्ते कसे गुळगुळीत होतील यावर भर देत आले. अंतर्गत रस्त्यांवर मनपाने आजपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मोठे रस्ते गुळगुळीत आणि दर्जेदार तयार करण्यासाठी मनपाकडे फारसा निधी नाही.
एकात्मिक रस्ते विकास योजनेत रस्ते विकास महामंडळाने मागील १५ वर्षांमध्ये अनेक विकासाची कामे केली. सर्वात अगोदर रेल्वेस्टेशन येथील उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यानंतर टाऊन हॉल, सेव्हन हिल, क्रांतीचौक, सिडको बसस्थानक चौक, महावीर चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात आले. दहा वर्षांपूर्वी रस्ते विकास महामंडळाने सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड, अशा अनेक रस्त्यांची कामेही केली. सध्या शहरात कामे करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाकडे काम नाही.1
शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडचा विकासही नॅशनल हायवेकडून करण्यात येणार आहे. सध्या जालना रोड कुठे ३० मीटर तर कुठे ३५ मीटर आहे. शहर विकास आराखड्यानुसार जालना रोड ४५ मीटर रुंद ठेवण्यात येणार आहे. 2
जालना रोड किमान आठपदरी करण्याच्या दृष्टीने मनपाच्या नगररचना विभागाने तयारी सुरू केली आहे. मागील महिन्यात अनेक ठिकाणी मार्किंगही करण्यात आली. सुमारे ४० ते ५० कोटी रुपये खर्च करून महावीर चौक ते केम्ब्रिज स्कूलपर्यंत रस्ता विकसित करण्यात येणार आहे. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनीही या कामासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
शहरात खराब रस्त्यांमुळे पर्यटक, उद्योजक, व्यावसायिक यांच्यासमोर मनपाची प्रतिमा मलीन होत आहे. शहरातील मोठे रस्ते चांगले गुळगुळीत करून त्यात सौंदर्यीकरणाची भर घालण्याचा विचार मनपा करीत आहे. रेल्वेस्टेशन ते हर्सूल टी पॉइंट हा रस्ता महामंडळाला तयार करण्यासाठी द्यावा.
४रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ असावेत, सायकलिंगसाठी जागा असावी, अशी कल्पना मनपाने मांडली आहे. याशिवाय आणखी काही रस्त्यांची निवड करून रस्ते विकास महामंडळाला प्रस्ताव देण्यात येणार आहे.
शहरातील काही महत्त्वाच्या जागा द्याव्यात, अशी मागणी रस्ते विकास महामंडळाने केली आहे. या जागांवर व्यावसायिक इमारती उभारून काही आर्थिक उत्पन्न मनपाला देण्यात येईल. मात्र, मनपाकडे अशा जागाच उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी मनपाने बीओटीवर अनेक जागा खाजगी व्यावसायिकांना देऊन टाकल्या आहेत.