नदीपात्र की डम्पिंग ग्राऊंड?

By Admin | Updated: May 27, 2014 00:59 IST2014-05-27T00:37:53+5:302014-05-27T00:59:31+5:30

जालना : शहरातून वाहणार्‍या सीना आणि कुंडलिका नद्यांच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे.

River bed dumping ground? | नदीपात्र की डम्पिंग ग्राऊंड?

नदीपात्र की डम्पिंग ग्राऊंड?

जालना : शहरातून वाहणार्‍या सीना आणि कुंडलिका नद्यांच्या पात्रात प्रचंड प्रमाणात कचरा आणून टाकला जात असल्यामुळे या नद्या आहेत की डंपींग ग्राऊंड हा प्रश्नच पडला आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमींकडून नद्या वाचविण्यासाठी विविधस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. गतवर्षी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दोन्ही नद्यातील कचरा, झाडे आदी सफाई केली होती. परंतु आजघडीला दोन्ही नद्यांच्या पात्रात कचर्‍याचे ढिगार लागले आहेत. नद्याच्या काठांना अतिक्रमणांचा विळखा घातला आहे. गतवर्षी भीषण दुष्काळामुळे जालनेकरांना पाण्याची किंमत कळाली. त्यामुळेच जलसंवर्धनासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. घाणेवाडी जलसंरक्षण मंचाने येथील कुंडलिका नदीवर शिरपूर पॅटर्नचे बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. त्याचे परिणाम आज समोर आहेत. बंधारे तुडूंब भरलेले आहेतच. शिवाय पाच कि़मी.च्या परिसरातील पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फारच कमी नागरिकांना पाण्याची टंचाई भासली. भविष्यात पाणीटंचाई भासू नये म्हणून आजही प्रयत्न होत आहेत. परंतु शाश्वत स्त्रोत असलेल्या दोन्ही नद्या आजही दुर्लक्षितच आहेत. दोन्ही नद्यांना नाल्या,गटाराचे स्वरूप आले आहे. परिसरातील नागरिक कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आणून टाकण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांचे पात्र उथळ, अरूंद होत आहे. पालिकेकडून सुशोभिकरण सोडाच पण पात्र प्रदूषित करण्यासाठी मोठा हातभार लावला जात आहे. पालिकेचे अनेक कर्मचारी बिनधास्त नदीपात्राचे डंपिंग ग्राऊंड करीत आहेत. नदीपात्रातील दोन्ही बाजंूना मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. कायम दुर्गंधी असते. कचर्‍यासोबतच काटेरी झुडुपे, मोठी झाडे, कॅरिबॅगचा ढिग पडलेला आहे. नदीपात्रातही काठावरील वस्त्या, नगरांमधून सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होत आहे. तसेच नद्यांना गटाराचे स्वरूप आले आहे. या परिसरात कायम दुर्गंधी पसरलेली आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत पात्रांची सफाई केली परंतु आज जैसेथे परिस्थिती असल्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेने या प्रमुख जलस्त्रोतांचे जतन केल्यास पाणीटंचाई निर्माण होणार नाही. परिसरातील पाणीपातळीतही वाढ होईल, अशी आशा पर्यावरणप्रेमींतून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) शहराच्या दोन्ही बाजूला नदीपात्रांमध्ये अतिक्रमण झाले आहे. पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो. काहीनी तर पक्के बांधकाम केल्याचेही दिसून येते. लाखो रुपये खर्च करुन घनकचरा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र प्रकल्पाची अवस्था बिकट बनली आहे, प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुुरु झालेला नाही. प्रकल्पाचे तीन तेरा वाजले. नदीपात्रांमधून कचरा व पाणी प्रदूषित होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. घरा-घरांमधून साठलेला कचरा प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये भरून या ठिकाणी आणून टाकण्यात येतो. त्यामुळे प्लास्टीकच्या पिशव्या ठिकठिकाणी अडकलेल्या दिसतात. नागरिकांनीही पर्यावरण व जलस्त्रोतांची काळजी घेण्याची गरज आहे. अशा प्रकारचा कचरा, प्लास्टीक पिशव्या या पात्रांत टाकू नये अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Web Title: River bed dumping ground?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.