पश्चिम मतदारसंघासाठी रिपाइंचा दावा
By Admin | Updated: June 10, 2014 00:59 IST2014-06-10T00:46:13+5:302014-06-10T00:59:48+5:30
विकास राऊत , औरंगाबाद लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना-भाजपा व रिपाइं या महायुतीला सध्या स्फुरण चढले आहे.

पश्चिम मतदारसंघासाठी रिपाइंचा दावा
विकास राऊत , औरंगाबाद
लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहता शिवसेना-भाजपा व रिपाइं या महायुतीला सध्या स्फुरण चढले असून, विधानसभेत पश्चिम मतदारसंघाची जागा मिळावी यासाठी रिपाइं आठवले गटाने डावपेच आखण्यास तयारी सुरू केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही महायुती अभेद्य राहिली तर रिपाइं त्या जागेसाठी नेटाने प्रयत्न करण्याच्या तयारीला लागली आहे.
शिवसेनेचे संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीकडून ती जागा रिपाइं (आ) गटासाठी सोडण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील, त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. रिपाइं खा.रामदास आठवले यांनी मध्यंतरी ती जागा मागण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य केले होते.
खा.चंद्रकांत खैरे आणि आ.शिरसाट यांच्यात मागील साडेचार वर्षांमध्ये विशेष असे सख्य राहिलेले नाही. जि. प. निवडणुका आणि विविध राजकीय कार्यक्रमांचा आढावा घेतला तर प्रत्येक व्यासपीठावरून दोघांमध्ये जुगलबंदी झालेली आहे. खा.खैरे यांचे चिरंजीव युवा सेनेचे जिल्हाधिकारी ऋषिकेश खैरे यांनादेखील त्या मतदारसंघातून निवडणूक मैदानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे यांची नावे चर्चेत आहेत. तसेच गेल्या वेळचे पराभूत उमेदवार चंद्रभान पारखे यांनाही उमेदवारीची अपेक्षा आहे. तर रमानगरचे नगरसेवक मधुकर सावंत यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. काँगे्रसला त्या मतदारसंघामध्ये पुष्कळ काम करण्याची गरज असल्याचे नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघातील मतांच्या आकड्यावरून दिसते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या त्या मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत २००९ मध्ये झाली होती.
आ. शिरसाट हे १४ हजार २१३ मतांनी विजयी झाले होते. यावेळी बहुरंगी लढत होण्याचे संकेत इच्छुकांच्या यादीवरून दिसत आहे. मनसे यावेळी उमेदवार देणार की नाही, याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. महायुतीमध्ये जागा वाटपांवरून काही वाद झाला तर भाजपादेखील पश्चिममधून निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपानेदेखील स्वतंत्र तयारी केली आहे. परंतु भाजपाने अजून उमेदवाराची चाचपणी केलेली नाही.
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
शिवसेनासंजय शिरसाट ५८,००८
काँग्रेसचंद्रभान पारखे ४३,७९७
अपक्षअमित भुईगळ ३७९१
इच्छुकांचे नाव पक्ष
आ. संजय शिरसाट शिवसेना
ऋषिकेश खैरे शिवसेना
जितेंद्र देहाडे काँग्रेस
डॉ.पवन डोंगरे काँग्रेस
अरविंद धीवर मनसे
मधुकर सावंत अपक्ष