पुनर्मूल्यांकन न करताच निकाल?
By Admin | Updated: May 27, 2014 01:23 IST2014-05-27T01:15:59+5:302014-05-27T01:23:20+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या रिड्रेसर पेपरची (पुनर्मूल्यांकन) तपासणी न करताच निकाल जाहीर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

पुनर्मूल्यांकन न करताच निकाल?
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखेच्या रिड्रेसर पेपरची (पुनर्मूल्यांकन) तपासणी न करताच निकाल जाहीर केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एका विद्यार्थ्यास चक्क न लिहिलेल्या प्रश्नाला गुण दिले, तर अन्य प्रश्नांचे उत्तर अचूक असताना त्यास कमी गुण देऊन नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या अन्यायग्रस्त विद्यार्थ्याने न्यायासाठी आपल्या आईसह विद्यापीठाची दारे ठोठावली आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, मयूर महेश श्रीवास हा विद्यार्थी औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग येथे बी.ई. तृतीय वर्षात शिकत आहे. नोव्हेंबर डिसेंबर २०१३ मध्ये विद्यापीठाने घेतलेली सत्र परीक्षा त्याने दिली. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक फिल्ड’ या विषयात तो नापास झाल्याचे त्यास समजले. पेपर चांगला गेल्याने त्याने पेपरचे पुनर्मूूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठाकडे फी भरली. त्यानंतर विद्यापीठाकडून त्यास त्या विषयाच्या उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत मिळाली. ही झेरॉक्स उत्तरपत्रिका त्याने दोन प्राध्यापकांकडून तपासून घेतली. तेव्हा त्याची उत्तरपत्रिका तपासणार्या शिक्षकाने गंभीर चुका केल्याचे निदर्शनास आले. प्रश्न क्रमांक ५ हा सोडवलाच नसताना त्याला गुण देण्यात आले. प्रश्न क्रमांक ६ सोडविलेला असताना त्यास गुण देण्यात आले नाहीत. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक २ सी व प्रश्न क्रमांक ३ ए, प्रश्न ७ ए आणि प्रश्न क्रमांक ९ बी ची उत्तरे अचूक असूनही गुण कमी देण्यात आले. शिवाय प्रश्न क्रमांक २ चे गुण एक्स्ट्रामध्ये टाकण्यात आल्याने त्याच्या एकूण गुणांची बेरीज २४ ऐवजी २३ झाली. त्यामुळे तो नापास झाला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने महाविद्यालयामार्फत ती झेरॉक्स उत्तरपत्रिका दुरु स्तीसाठी विद्यापीठाला सादर केली. विद्यापीठाने त्या पेपरचे पुनर्मूल्यांकन न करताच निकाल जाहीर केला आणि जुना निकाल योग्यच असल्याचे सांगितले. शैक्षणिक कर्जाचा हप्ता कसा मिळेल? शैक्षणिक कर्ज घेऊन शिकत असलेला महेश म्हणाला की, नापास झाल्याने पुढील फीचा हप्ता बँकेकडून मिळणार नाही. तेव्हा आम्ही फी कोठून भरणार? विद्यापीठाने चूक दुरुस्त करून हुशार विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स प्रतीने पेपर तपासणीत झालेल्या घोळाचे बिंग फुटले आहे. पेपर तपासणार्या शिक्षकाने न सोडविलेला प्रश्न क्रमांक ५ ला ४ गुण दिल्याचे आणि सोडविलेल्या प्रश्न क्रमांक ६ ला गुणच दिले नसल्याचे स्पष्ट दिसते.