आमदारांच्या सत्त्वपरीक्षेचाही ‘निकाल’
By Admin | Updated: May 14, 2014 23:57 IST2014-05-14T23:21:31+5:302014-05-14T23:57:25+5:30
जालना : जालना व परभणी लोकसभा मतदारसंघात विजयाच्या वल्गना केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकारी, सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या आमदारांची १६ मे रोजी कसोटी लागणार आहे.

आमदारांच्या सत्त्वपरीक्षेचाही ‘निकाल’
जालना : जालना व परभणी लोकसभा मतदारसंघात रंगलेल्या तुल्यबळ लढतीत आप-आपल्या पक्षासह उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या तसेच आकडेमोड करीत, हमखास मताधिक्यासह विजयाच्या वल्गना केलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकारी, सत्तारूढ व विरोधी पक्षाच्या आमदारांची १६ मे रोजी कसोटी लागणार आहे. यावेळीच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळेच प्रमुख राजकीय पक्षांच्या मातब्बर पुढार्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या होत्या. उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच केल्यानंतरसुद्धा यश-अपयश पत्करलेल्या या सर्वांनी लगेचच रुसवे-फुगवे, नाराजी, गटबाजी वगैरे बाबी बाजूला सारून पक्षासह अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे समर्थन उभे केले. अंग झटकून मोर्चेबांधणी केली. आप-आपल्या कार्यक्षेत्रात ठाण मांडून या सर्व मातब्बरांसह कार्यकर्त्यांनी आपला प्रभाव सिद्ध व्हावा, विरोधकांनी घुसखोरी करु नये यासाठी भक्कम व्यूहरचना केली. पाठोपाठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते बैठका, कॉर्नर सभा, मोठ्या सभा, संमेलने व रॅलींमधून जोरदार शक्तीप्रदर्शन व्हावे म्हणून, उमेदवारांच्या बरोबरीने सर्वार्थाने प्रयत्न केले. आप-आपल्या कार्यक्षेत्रात अल्पावधीतच सर्व माध्यमांचा उपयोग करीत, प्रचारयुद्ध पेटवून दिले. प्रचाराची राळ उडवून या सर्वांनी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरेल, असे तंत्र-मंत्रही वापरले. पडद्याआड व पडद्यावर रंगलेल्या डावपेचाच्या खेळ्यांनीही प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांना धक्का द्यावयाचा प्रयत्न केला. दोन्ही मतदारसंघात नव्या व जुन्या पिढीतील सर्व आजी-माजी पदाधिकारी व पुढारी या रणधुमाळीत कमालीचे व्यस्त होते. त्यामुळेच प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीने वातावरण अक्षरश: ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवरच मतदानाची टक्केवारी वाढणार हे स्पष्ट होते. मतदानाच्या दिवशी या पुढार्यांसह आजी-माजी पदाधिकार्यांनी आप-आपल्या कार्यक्षेत्रात ठाण मांडून आपल्या उमेदवाराच्या पारड्यात जास्तीत-जास्त मते पडावीत व मताधिक्य मिळावे, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी या दोन्ही मतदारसंघात अंतर्गत गटबाजी, हेवेदावे वगैरे गोष्टी प्रकर्षाने किमान पडद्यावर का असेना जाणवल्या नाहीत. या दोन्ही मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. काही विधानसभेत अभूतपूर्व मतदान झाले. त्यामुळे पुढार्यांसह पदाधिकारी व खुद्द उमेदवारसुद्धा अचंबीत झाले आहेत. वाढलेल्या टक्केवारी कोणास पूरक ठरेल, याची तेथूनच चर्चा सुरू झाली. आता या चर्चेने अंतिम टप्पा गाठला आहे. (प्रतिनिधी) सत्तारूढ गटाचा लागणार कस जालना लोकसभा मतदारसंघात सत्तारूढ काँग्रेस आघाडीचे राजकीयदृष्ट्या वर्चस्व आहे. जालना, सिल्लोड व फुलंब्री हे तीन काँग्रेसच्या, भोकरदन व पैठण हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतही काँग्रेस आघाडीचेच प्राबल्य आहे. असे एकूण या मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे सहा आमदार आहेत. या सहाही आमदारांनी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्यामागे भक्कम समर्थन उभे करू, असा दावा केला. आता मताधिक्याची स्पर्धा लागेल, अशा वल्गना केल्या. बदनापूर विधानसभेत शिवसेनेचे प्राबल्य आहे. या व्यतिरिक्त जालना जिल्हा परिषद भाजप-सेना युतीच्या ताब्यात असून, जालना, सिल्लोड या दोन पालिका काँग्रेसच्या, भोकरदन व पैठण या दोन पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात विद्यमान आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी-सदस्यांची कसोटी मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी लागणार आहे. गेल्या महिना-दीड महिन्यापासून मताधिक्यासह विजयाच्या वल्गना केलेल्या आमदारांसह अन्य पदाधिकार्यांनी आता मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेतल्या आहेत. मतदानाच्या टप्प्यापाठोपाठ भक्कम दावे केलेल्या या सर्वांना गेल्या काही दिवसातील आप-आपल्या कार्यक्षेत्रातील एकूण वातावरण, कल लक्षात आल्यानंतर या सर्वांनी आकडेमोडीऐवजी गोलमोल भाषा सुरू केली आहे. त्यामुळेच उमेदवारासह पक्षहीश्रेष्ठीही अचंबित झाली आहे.