अतिक्रमणांना मनपाच जबाबदार
By Admin | Updated: September 15, 2015 00:36 IST2015-09-15T00:06:38+5:302015-09-15T00:36:06+5:30
अशोक कारके , औरंगाबाद महापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये

अतिक्रमणांना मनपाच जबाबदार
अशोक कारके , औरंगाबाद
महापालिका प्रशासन आणि १३ लाख नागरिक गेल्या काही महिन्यांपासून ‘स्मार्ट औरंगाबाद’चे स्वप्न पाहत आहेत. याच स्वप्नातील औरंगाबादमध्ये आजघडीला अनेक समस्या आहेत. त्यातील मुख्य समस्या म्हणजे शहरातील अरुंद आणि खड्डेमय रस्ते. मनपाने याच अरुंद रस्त्यांपैकी जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नुकतीच कारवाई केली आहे. या कारवाईत अनेकांची घरे भुईसपाट झाली आहेत. या मोहिमेनंतर प्रशासनाने ५० रस्त्यांची मार्किंग केली असून, याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने ‘शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण आणि मनपाची कारवाई’ याविषयी सर्वेक्षण केले असता, या सर्वेक्षणात रस्त्यावरील ‘अतिक्रमणाला मनपाच जबाबदार’ असल्याचे मत ७६ टक्के औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे.
महापालिकेने जयभवानीनगर, शिवाजी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली आहेत. याचदरम्यान न्यायालयाच्या आदेशाने महसूल विभागाने मकबरा परिसरातील रेणुकामातानगर येथेही कारवाई केली. त्यामध्ये हक्काची घरे असणाऱ्या नागरिकांना बेघर व्हावे लागले. यानंतर मनपाने शहरातील ५० रस्त्यांचे मार्किंग केले. या मार्किंगमध्ये अनेकांची घरे तुटणार हे निश्चित झाल्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच ढवळले होते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात ‘अतिक्रमणास जबाबदार असणाऱ्या भूखंड माफियांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी’, असे मत ८० टक्के नागरिकांनी व्यक्त केले, तर मनपाच्या रस्ता रुंदीकरण मोहिमेला ६६ टक्के नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. २४ टक्के नागरिकांनी मोहिमेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. १० टक्के नागरिकांनी काही प्रमाणात पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात मत व्यक्त केले आहे, तर शहरातील ‘अतिक्रमणाला मनपा प्रशासन जबाबदार आहे’, असे मत ७६ टक्के नागरिकांनी सर्वेक्षणात मांडले आहे, तर १८ टक्के नागरिकांनी मनपा जबाबदार नसल्याचे म्हटले.