गेवराईतही प्रतिसाद ‘जेल भरो’ने जिल्हा दणाणला
By Admin | Updated: September 15, 2015 00:30 IST2015-09-14T23:28:47+5:302015-09-15T00:30:27+5:30
बीड : राज्यात दुष्काळी जाहीर करा, तातडीच्या उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करुन जेलभरो आंदोलन केले

गेवराईतही प्रतिसाद ‘जेल भरो’ने जिल्हा दणाणला
बीड : राज्यात दुष्काळी जाहीर करा, तातडीच्या उपाययोजना करा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करुन जेलभरो आंदोलन केले. यावेळी प्रमुख नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन लगेचच सुटका केली. शहरातील शिवाजी चौकात तब्बल तीन तास रास्ता रोको झाला. त्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. सर्वत्र आंदोलन शांततेच्या मार्गाने झाले.
दुष्काळी स्थितीत सरकारकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात असून उपाययोजनांकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. जिल्ह्यात आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे सूचविले होते. त्यानुसार क्षीरसागरांनी वडवणी, मांजरसुंबा, घाटसावळी, बीड, रायमोहा येथील आंदोलनांमध्ये सहभाग नोंदविला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यकर्त्यांनी चारही रस्ते रोखून धरली.बैलगाड्यांसह काही शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नेतृत्व केले. माजी आ. राजेंद्र जगताप, उषा दराडे, सय्यद सलीम, डॉ. योगेश क्षीरसागर, अॅड. सुभाष राऊत, अमर नाईकवाडे, महेश धांडे, प्रिया डोईफोडे, विनोद इंगोले, मोईन मास्टर आदी सहभागी होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आ. क्षीरसागर यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारने सामान्यांची मते घेऊन सत्ता मिळवली;परंतु शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत करण्याची भावना नाही. पाणी, चारा नाही. रोज एक शेतकरी मृत्यूला कवटाळतो आहे. मात्र, सत्ताधारी झोपेचे सोंग घेत आहेत. मोदी मते मागायला आले; परंतु आता मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना ते फिरकलेही नाही, असा टोलाही त्यांनी मारला.
यावेळी राकॉ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीला फक्त राष्ट्रवादी पक्ष धावून आलेला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ गंभीर स्वरुप धारण करत असताना पंतप्रधान, मुख्यमंत्री परदेशवाऱ्यात दंग आहेत. आघाडी सरकारने ७३ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली होती. या सरकारने बिहारला मदतीची घोषणा केली;परंतु शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही असा चिमटाही काढला. सत्ताधारी उद्योगपतींचे हित जोपासत आहे, शेतकऱ्यांबाबत त्यांना कुठलीही दया नाही असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय, हक्कासाठी गुन्हे नोंद झाले, जेलमध्ये जावे लागले तरी चिंता नाही असे स्पष्ट केले.
आंदोलनस्थळीच तात्पुरते जेल
कन्या शाळेत पोलिसांनी तात्पुरत्या जेलची उभारणी केली होती. आंदोलनकर्त्यांना अटक करुन या जेलमध्ये काही वेळ ठेवले होते. पाच हजारावर कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)
तालुक्यातील उमापूर फाटा येथे आ. अमरसिंह पंडित, भेंडटाकळी फाटा येथे जि.प. अध्यक्ष विजयसंह पंडित व शहरात माजी आमदार बदामराव पंडित यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन झाले. जि.प.सदस्य युधाजित पंडित, पंढरीनाथ लगड, शेख खाजा, राजेंद्र भंडारी, भाऊसाहेब नाटकर , आप्पासाहेब गव्हाणे, कुमार ढाकणे, विलास चव्हाण, दिगांबर येवले, मदनराव घाडगे आदी उपस्थित होते. हजारो कायकर्त्यांना अटक झाली.
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दुष्काळी मोर्चा काढला होता. जेल भरोच्या निमित्ताने त्यांनी सर्व तालुक्यांत बैठका घेऊन नियोजन केले होते. त्यांच्या हाकेला जिल्ह्यातील राकॉचे सर्व नेते धावून आले. त्यामुळे सर्वच भागांत मोठा प्रतिसाद लाभला. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यासह इतर नेत्यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या नियोजनाचा आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.