आरक्षित पाण्याचा उपसा सुरु
By Admin | Updated: July 6, 2014 00:26 IST2014-07-05T23:54:27+5:302014-07-06T00:26:06+5:30
आशपाक पठाण , लातूर पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

आरक्षित पाण्याचा उपसा सुरु
आशपाक पठाण , लातूर
पावसाने ओढ दिल्याने लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यातही ५ लाखांवर लोकसंख्या असलेल्या लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पापैकी मोजक्याच प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध आहे़ मोठे, मध्यम व लघु असलेल्या १३७ प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ तर लातूर, औसा, निलंगा व देवणी तालुक्यात सर्वच प्रकल्प कोरडे पडल्याने पाणीटंचाईचे चटके तीव्र होत आहेत़ उपलब्ध असलेल्या प्रकल्पातील पाणीसाठ्यांतून शेतीसाठी उपसा सुरूच असल्याने दिवसेंदिवस पाणीपातळीत मोठी घट होत आहे़ वाढती टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठ्यांचा वापर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी व्हावा, असे आदेश पाटबंधारे विभागाला दिले आहेत़
लोकमत चमूने शनिवारी जिल्ह्यातील पाणी साठ्यांची पाहणी केली़ या पाहणीत बहुतांश पाणीसाठ्यांचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत असल्याचे आढळून आले़ लातूर जिल्ह्यात तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत़ यापैकी रेणापूर २०, तिरू १६, देवर्जन ३४, साकोळ १९, घरणी २०, मसलगा मध्यम प्रकल्पात १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे़ आठ प्रकल्पाची एकूण सरासरी १५ टक्के असली वाढती उष्णता व शेतीसाठी होणारा उपसा यामुळे पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे़ जिल्ह्यात असलेल्या १२७ लघु प्रकल्पांपैकी ९२ प्रकल्पांना कोरड पडली आहे़
प्रकल्पांतील पाणीसाठ्याच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके धोक्यात आली आहेत़ तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने अनेक गावे टंचाईच्या गर्तेत अडकली आहेत़ लातूर तालुक्यातील ६, औसा १५, देवणी तालुक्यातील ११ लघुप्रकल्प कोरडेठाक आहेत़ ग्रामीण भागातील विहिरी, विंधन विहिरीचे पाणी तळाला गेल्याने पाणीटंचाई वाढली आहे़ जिल्ह्यात जळकोट तालुक्यातील १५ पैकी चार प्रकल्पाने तळ गाठला असला तरी ११ प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे़ पाणीसाठा शिल्लक असल्याने त्या प्रकल्पावरील शेतकऱ्यांनी पाण्याचा भरमसाठ उपसा सुरू केला आहे़ मात्र, प्रशासनाने अजून एकही कारवाई केलेली नाही़
उपसा थांबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लातूर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्गमित करण्यात आला होता़ शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत लातूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने टंचाई निर्माण झाली आहे़ पेयजल टंचाईच्या निवारणार्थ करावयाच्या संभाव्य उपाययोजनांच्या अनुषंगाने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावेत, असे आदेश आहेत़ त्यामुळे सदरील प्रकल्पातील पाणी शेती अथवा इतर कारणासाठी वापरले जाणार नाही याची दक्षता घ्यावी़ सर्व प्रकल्पातील पाण्याचा अनाधिकृत उपसा बंद करण्यासाठी पथक नियुक्त करून कालबध्द कार्यक्रम तयार करावा़ त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ विपीन शर्मा यांनी ३ जुलै रोजी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिले आहेत़
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणानेही तळ गाठल्याने लातूरकरांची तहान भागविणे कठीण झाले आहे़ प्रकल्पात चर खोदूनही उपयुक्त पाणी मिळत नसल्याने पंप बंद पडण्याची वेळ आली आहे़ शहरात पाणीटंचाईचे चटके वाढल्याने नागरिकांची भटकंती होत आहे़ नागझरी प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र, या प्रकल्पातून काही ठिकाणी मोटारी सुरू असल्याचे शनिवारी आढळून आले़