दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमणे

By Admin | Updated: June 17, 2014 01:11 IST2014-06-17T00:28:28+5:302014-06-17T01:11:35+5:30

बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणांचा पुन्हा विळखा पडला आहे.

Repeat in two days | दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमणे

दोन दिवसांत पुन्हा अतिक्रमणे

बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणांचा पुन्हा विळखा पडला आहे. मागील दोन दिवसांपूर्वीच महामार्गावरील अतिक्रमणांवर नगर परिषदेने हातोडा फिरविला होता. मात्र या अतिक्रमणधारकांवर कोणाचाच वचक राहिला नसल्याने त्यांनी पालिकेच्या कारवाईला ठेंगा दाखवत पुन्हा अतिक्रमणे महामार्गावर अतिक्रमणे थाटली आहेत.
शहरातूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मोठ्या वाहनांच्या वर्दळीचा त्रास लहान वाहनांना सहन करावा लागतो. यातच महामार्गावर हातगाडे, फळगाडे, अवैध वाहतूक करणारे वाहने उभी रहात असल्याने महामार्ग अरूंद झाला आहे. या अरूंद रस्त्यामुळे वाहनकोंडी होत आहे. या रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित करताच नगर पालिकेने दखल घेतली होती. अवघ्या तीन दिवसात शहरातील नगर रोड, जालना रोड आणि बार्शीरोडवरील अतिक्रमणांवर हातोडा फिरविला. महामार्गावरील अतिक्रमणे हटविताना पोलिस बंदोबस्तही नव्हता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही नव्हते. त्यामुळे नगर परिषदेला अतिक्रमणे हटविताना अडचणी येत असल्याचे मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी सांगितले होते.
महामार्गावरील अतिक्रमणे हटविल्यामुळे दोन दिवस महामार्गाने मोकळा श्वास घेतला होता. मात्र अवघ्या दोन दिवसातच पुन्हा अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे महामार्गावर थाटल्याने वाहनकोंडी होत आहे. पालिकेने केलेल्या कारवाईला या अतिक्रमणधारकांनी केराची टोपली दाखविल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
अपघातास जबाबदार कोण ?
या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत. या अपघातात निष्पाप लोकांचे प्राण गेलेले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातांना काहीप्रमाणात अतिक्रमणधारकही जबाबदार असावेत, म्हणून अपघातानंतर अवघ्या काही तासांतच महामार्गावरील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरविण्यात आले होते.
मात्र नंतर पंधरा दिवसातच जैस थे परिस्थिती झाल्याने पुन्हा अपघातास निमंत्रण मिळत आहे. यानंतर जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रशासनाचा हालगर्जीपणा सर्वसामान्यांच्या जीवावर बेतल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे. याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले या अतिक्रमणधारकांवर आता आम्ही थेट गुन्हे दाखल करणार आहोत. कारवाई पुन्हा सुरू करू. (प्रतिनिधी)
कठोर कारवाईची गरज
महामार्गावरील अतिक्रमणे हटविताना पोलिस प्रशासन व सार्वजनीक बांधकाम विभाग सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. अतिक्रमणे हटविताना पोलिस बंदोबस्त नव्हता त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारक दबाव आणत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कुठलिही रिस्क न घेता सावधानतेने अतिक्रमणे हटविले होते. महामार्गावर अतिक्रमण करून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही जनतेतून होत आहे. दोन दिवसांपूर्वी हटविण्यात आलेल्या अतिक्रमीत जागेवरच पुन्हा अतिक्रमणे थाटू लागल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.

Web Title: Repeat in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.