गणेशोत्सवात तरी काळोख दूर करा
By Admin | Updated: September 13, 2015 00:01 IST2015-09-12T23:47:08+5:302015-09-13T00:01:14+5:30
जालना : नगर पालिका व महावितरणच्या टोलवाटोलवीत शहरवासियांना बंद पथदिव्यांमुळे गत दोन वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवात तरी काळोख दूर करा
जालना : नगर पालिका व महावितरणच्या टोलवाटोलवीत शहरवासियांना बंद पथदिव्यांमुळे गत दोन वर्षांपासून अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दहा दिवसीय अशा भव्य सोहळा म्हणजेच गणेशोत्वात तरी पथदिवे सुरु होणार की नाही, असा सवाल शहरवासीयांतून होत आहे.
शहरातील बंद पथदिव्यांबाबत कोणीच काही बोलण्यास तयार नाही. याचा परिणाम शहरवासियांवर होत आहे. अंधारामुळे अपघात, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळनंतर महिलांना बाहेर पडणे जिकिरीचे होऊन बसले आहे. असे असले तरी पालिका आपल्या साचेबद्ध उत्तरावर ठाम आहे. अंधारातच गणपतीचे स्वागत जालनेकरांना करावे लागणार आहे. याचे गांभीर्य कोणालाच नसल्याचे वास्तव चित्र आहे. जालना नगर पालिकेकडे वीज महावितरणची ९ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. अभय प्रकाश योजनेमार्फत पालिकेला बिल भरण्यास सूट देण्यात आली होती. महावितरणने पालिकेला १ कोटी ८० लाखाचे चार हप्ते व ७ लाखाचे आठ हप्ते पाडून दिले होते. त्यानुसार जालना नगर पालिकेने जानेवारी २०१४ मध्ये १ कोटी ८० लाखाचा हप्ता भरल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यानंतर दरमाह हप्ता भरणे गरजेचे असताना पालिकेने दुसरा हप्ता सप्टेंबर २०१४ मध्ये भरला. या योजनेत पालिकेने केवळ दोनच हप्ते भरले. जालना नगर पालिकेकडे महावितरणचे एकूण ९ कोटी २९ लाखांचे पथदिव्यांचे बिल थकित आहे. त्यात मूळ थकबाकीची रक्कम ५ कोटी ६४ लाख, त्याच्या व्याजाची रक्कम ३ कोटी ५४ लाख व बिलाचे ११ लाख या प्रमाणे थकलेले आहे. (प्रतिनिधी)