भरपावसात अतिक्रमण हटाव
By Admin | Updated: June 15, 2017 23:20 IST2017-06-15T23:16:10+5:302017-06-15T23:20:09+5:30
वसमत : गुरुवारी तर भरपावसात पुन्हा कायम होवू पाहणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आले.

भरपावसात अतिक्रमण हटाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : एकदा हटवलेली अतिक्रमणे पुन्हा बसू नयेत यासाठी तहसीलदारांनी यत्रंणा कार्यान्वित केली आहे. गुरुवारी तर भरपावसात पुन्हा कायम होवू पाहणाऱ्या अतिक्रमणांवर बुलडोजर चालविण्यात आले. तहसीलदारांच्या या धडाकेबाज कामगिरीला पोलीस निरीक्षकही दमदार साथ देत असल्याने शहर अतिक्रमणमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.
वसमतच्या मुख्याधिकारीपदाचा प्रभार तहसीलदार उमाकांत पारधे यांच्याकडे आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. मात्र नगरपालिकेने मोहिमेपुरते व फोटो काढण्यापुरते अतिक्रमण काढायचे आणि परत त्याच जागेवर अतिक्रमण करायचे अशी सवय लागलेली असल्याने, या मोहिमेतही अतिक्रमणधारक सज्ज आहेत. मात्र तहसीलदारांनी एकदा काढलेली अतिक्रमणे पुन्हा होवू नयेत यासाठी कायम बुलडोजर व पथक फिरते ठेवण्याची योजना सुरु केली आहे. त्यामुळे अतिक्रमणाला लगाम लागलेला आहे. काही जणांनी मुख्याधिकारीपदी प्रचंडराव येणार असल्याच्या बातम्या वाचून पुन्हा पहिल्या जागेवर अतिक्रमणे करणे सुरु केले होते.
हे समजताच तहसीलदारांनी गुरुवारी भरपावसात अतिक्रमणांवर बुलडोजर चालवले. भरपावसात अतिक्रमण काढण्याची वसमतमध्ये ही पहिलीच वेळ आहे. या मोहिमेला पोनि उदयसिंग चंदेल हे स्वत: उभे राहून पोलीस संरक्षण देत असल्याने अतिक्रमणधारकांच्या हालचाली बंद झाल्या आहेत. ज्या ठिकाणावरुन अतिक्रमण काढले त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होऊ न देण्याचा निर्णय पारधी व चंदेल यांनी घेतला असून कुणाचीही गय केली जात नाही.