अनर्थ टळल्याने सुटकेचा निश्वास
By Admin | Updated: June 2, 2017 00:38 IST2017-06-02T00:34:07+5:302017-06-02T00:38:10+5:30
जालना : रेवगाव फाट्यावर बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात डिझेल टँकरच्या धडकेत वीजप्रवाह सुरू असलेला खांब मुख्य रस्त्यावर पडला

अनर्थ टळल्याने सुटकेचा निश्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेवगाव फाट्यावर बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण अपघातात डिझेल टँकरच्या धडकेत वीजप्रवाह सुरू असलेला खांब मुख्य रस्त्यावर पडला. विजेच्या तारांमधून स्पॉर्किंग होऊ लागली. याच वेळी रस्त्यावर अन्य वाहने जात होती. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत दोन्ही बाजूची वाहने थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कार व डिझेल टँकरचा अपघात घडला तेंव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांची पॅट्रोलिंगची व्हॅन ट्रकपासून काही अंतरावर होती. समोर अपघात घडल्याचे लक्षात बारी यांच्यासह कदीम जालना ठाण्याच्या पॅट्रोलिंग पथकातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, उपनिरीक्षक एस. डी. शेजूळ, कर्मचारी सुधीर गायकवाड, धम्मा सुरडकर, वर्मा हे मदतीसाठी धावले.
पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही बाजूने येणारी वाहने थांबवली. अंबड चौफुली व मंठा चौफुलीवरून येणारी शहरातून वळवली. ही वाहने रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारावरून गेली असती, तर विजेची स्पॉर्किंग होऊन बाजूला पडलेल्या टँकरमधील डिझेल व पेट्रोल टॉकीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.
इंडिका कारमधील जखमी चालक दत्ता त्र्यंबक टोळ, सलमान खान पठाण, साजनबी पठाण यांना पोलीसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ बाहेर काढून
रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविल्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करता आले. दरम्यान, मुख्य रस्त्यावर असलेल्या रेवगाव फाट्यावर अंधार राहत असल्यामुळे दोन्ही बाजूने भरधाव येणारी वाहने अचानक समोरासमोर येऊन या पूर्वीही अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पथदिवे बसविण्याची गरज आहे.