किरकोळ तक्रारींचाही लागेना निकाल!
By Admin | Updated: December 8, 2015 00:05 IST2015-12-07T23:36:28+5:302015-12-08T00:05:43+5:30
हणमंत गायकवाड , लातूर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या लोकशाही दिनात किरकोळ तक्रारींवरही जागेवर निकाल लागत नाही़

किरकोळ तक्रारींचाही लागेना निकाल!
हणमंत गायकवाड , लातूर
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या लोकशाही दिनात किरकोळ तक्रारींवरही जागेवर निकाल लागत नाही़ सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात केवळ ८ तक्रारी दाखल होत्या़ यापैकी एकाही तक्रारीचा निकाल लागू शकला नाही़ लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहूनही तक्रारकर्त्यांना निरुत्तर व्हावे लागत आहे़
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन झाला़ या लोकशाही दिनात एकूण ८ अर्ज आले होते़ त्यापैकी पोलीस विभागाशी संबंधीत ३, महसूल २, जिल्हा परिषद २ आणि महावितरण विभागाशी संबंधीत १ अर्ज होता़ दुपारी १२ ते १़३० वाजेपर्यंत लोकशाही दिन झाला़ परंतु यापैकी एकाही तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा निकाल लागू शकलेला नाही़ साध्या आणि किरकोळ स्वरुपाच्या तक्रारी असतानाही लोकशाही दिनात न्याय मिळाला नाही़ वारंवार तक्रारी देऊनही न्याय मिळत नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे़
सोमवारी दाखल झालेल्या सर्वच तक्रारी संबंधीत विभागाकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून वर्ग करण्यात आल्या आहेत़ लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ़ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम, महावितरणचे मुख्य अभियंता बी़ ए़ वासनीक, कार्यकारी अभियंता सुरेश फेरे, जिल्हा उपनिबंधक बी़ एल़ वांगे, विभाग नियंत्रक डी़ बी़ माने, उपकार्यकारी अभियंता ओ़ के़ कुंचमवार, लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता एस़ जी़ टिंगळे, गटविकास अधिकारी बी़ टी़ चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ़ पी़ एस़ कापसे यांची उपस्थिती होती़ परंतु तक्रारींवर निकाल लागला नाही़