गणरायाने केला ७०० किमीचा विक्रमी प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 15:07 IST2017-08-05T15:04:49+5:302017-08-05T15:07:55+5:30

रांगोळीने बार्इंडींगच्या खर्ड्या पुठ्ठयावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपुर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० किमीचा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

Recorded 700 km journey by Ganaraya! | गणरायाने केला ७०० किमीचा विक्रमी प्रवास !

गणरायाने केला ७०० किमीचा विक्रमी प्रवास !

ठळक मुद्देफेब्रुवारी २०१५ साली त्यांच्या मनात एक अचाट कल्पना आली आणि त्यांनी ७३ तासात बार्इंडिंगच्या जाड पुठ्ठयावर श्रीगणेशाची तब्बल १०८ वेगवेगळी रूपे साकारली. खर्ड्या पुठ्ठयावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपुर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० किमीचा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

ऑनलाईन लोकमत / ऋचिका पालोदकर

औरंगाबाद, दि. ५  : २०१५ साली रांगोळीने बार्इंडींगच्या खर्ड्या पुठ्ठयावर साकारलेल्या श्रीगणेशाच्या १०८ रूपांनी काही महिन्यांपुर्वी औरंगाबाद ते नागपूर असा तब्बल ७०० किमीचा रेल्वेप्रवास करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. जान्हवी जयंत जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. विशेष म्हणजे हे गणपती डिंक किंवा तत्सम कोणत्याही गोष्टींनी पुठ्ठ्यावर चिटकवलेले नाहीत, हे जेव्हा बघणा-यांना कळते तेव्हा ते आश्चर्याने तोंडात बोटे घातल्याशिवाय राहात नाहीत. 

जान्हवी जोशी यांना रांगोळी काढण्याचा छंद आहे. फेब्रुवारी २०१५ साली त्यांच्या मनात एक अचाट कल्पना आली आणि त्यांनी ७३ तासात बार्इंडिंगच्या जाड पुठ्ठयावर श्रीगणेशाची तब्बल १०८ वेगवेगळी रूपे साकारली. केवळ आवड म्हणून त्यांनी हौशेतून हे गणपती साकारले. त्यांच्या या अनोख्या छंदाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि युनिक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड या संस्थांनी घेऊन त्यांना प्रमाणित केले. या विक्रमासाठी त्यांना पती जयंत जोशी यांची पुर्णपणे साथ मिळाली. 

हे गणपती त्यांनी त्यांच्या घरात सांभाळून ठेवले तसेच शहरात त्यांचे वेळोवेळी प्रदर्शनही भरविले. गणपतीच्या दिवसात सहसा ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना जीवाला’ अशा घोषणा दिल्या जातात. यातील ‘गणपती गेले गावाला’ हे वाक्य जयंत यांच्या मनात वेगळ्याच पद्धतीने चमकून गेले आणि त्यांनी हे गणपती त्यांच्या मुळ गावाला म्हणजेच नागपूरला नेण्याचे ठरविले. त्यांची ही कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटली. पण जोशी पती- पत्नींनी जणू बाप्पांना नागपूरला नेण्याचा चंगच बांधला होता.

हे गणपती पुठ्ठयावर चिटकविलेले नसल्यामुळे त्यांना सहीसलामत नागपूरपर्यंत नेणे मोठे आव्हानात्मक काम होते पण जोशी दाम्पत्याचा निश्चय पक्का होता. दोघांनी मिळून गणपती साकारलेले प्रत्येकी १० पुठ्ठे एकावर एक असे रचले आणि अशाप्रकारे एकून ११ गठ्ठे तयार केले. त्यानंतर कागदाच्या आवरणात हे गठ्ठे व्यवस्थित गुडाळले आणि दि. २१ सप्टेंबररोजी नंदिग्राम रेल्वेने बाप्पांनी नागपूरकडे प्रस्थान केले.

डोळ्यात तेल घालून जोशी दाम्पत्यांनी जपलेल्या या कलाकृती नागपुरला सुखरूप पोहोचल्या. यातील काही प्रतिमा थोड्याफार खराब झाल्या पण जान्हवी यांनी त्यात चटकन सुधारणा केल्या. यानंतर नागपूर येथे लक्ष्मीनगर भागात या रांगोळ्यांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले. नागपूरकरांनी जान्हवी यांच्या या अफलातून कलेला मनापासून दाद दिली. बाप्पांच्या या थक्क करणा-या प्रवासाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आणि काही दिवसांपुर्वीच जान्हवी व जयंत जोशी यांना नामांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

विश्वविक्रमी छंद
रांगोळीतून गणपती काढणे हा माझा केवळ छंद आहे. रांगोळी काढणे ही आपली संस्कृती आहे. गणेशमुर्ती साकारताना विश्वविक्रम करावा, असा माझा कोणताही उद्देश नव्हता. केवळ आपली आवड, आपली संस्कृती लोकांसमोर यावी, या निस्वार्थ हेतूने मी रांगोळी काढत गेले. यासाठी मला पती जयंत जोशी यांनी वेळोवेळी मोलाची साथ दिली. - जान्हवी जोशी.
 

Web Title: Recorded 700 km journey by Ganaraya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.