पावसासाठी अल्लाहकडे साकडे

By Admin | Updated: July 19, 2015 00:59 IST2015-07-19T00:46:57+5:302015-07-19T00:59:16+5:30

लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी

Recite to Allah for rain | पावसासाठी अल्लाहकडे साकडे

पावसासाठी अल्लाहकडे साकडे


लातूर : जिल्ह्यात रमजान ईद शनिवारी उत्साहात साजरी झाली़ शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९़३० वाजता नमाज पठण झाल्यानंतर मौलाना इस्माईल कास्मी यांनी पाऊस पडावा, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्यात़ देशाची व लातूर शहराची शांतता कायम राहवी, यासाठी दुवा मागितली़ सकाळी ९़३० ते १० वाजेपर्यंत बयान झाले़ त्यानंतर समाजबांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या़ वाहतुकीला अडथळा येवू नये म्हणून पोलिस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदलही केला होता़ आ़ अमित देशमुख यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या़ मौलाना मुस्तफा मजाहिरी यांनी नमाज पठण केले़ यावेळी बयान करताना मौलाना इस्माईल कास्मी म्हणाले, जकात देणे ही चांगली बाब आहे़ प्रत्येकाने आपापल्या परीने जकात दिली पाहिजे, प्रत्येकाची ती बांधिलकी आहे़ सध्या पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ त्यामुळे तो आत्महत्या करीत आहे़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल़ देशात शांतता नांदावी, अशी प्रार्थना मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़
यावेळी ईदगाह मैदानावर आ़विक्रम काळे, माजी आ़ वैजनाथ शिंदे, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक डॉ़ ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी वामन खरात, तहसीलदार संजय वारकड, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ बी़व्ही़ मोतीपवळे, राजा मणियार, अ‍ॅड़ समद पटेल, अ‍ॅड़ आण्णाराव पाटील, बसवंतअप्पा उबाळे, शैलेश लाहोटी, नरेंद्र अग्रवाल, अ‍ॅड़ विक्रम हिप्परकर, मोईज शेख, चाँदपाशा घावटी, मोहन माने यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचा प्रचंड मोठा जनसमुदाय होता़ नमाज अदा केल्यानंतर प्रत्येकाने पाऊस पडावा म्हणून दुवा मागितली़
बार्शी रस्त्यावर दयानंद महाविद्यालयासमोर ईदगाह मैदान असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बदलण्यात आली होती़ सकाळी ८ वाजल्यापासून या रस्त्यावरील वाहतूक समांतर रस्त्यावरुन वळविण्यात आली होती़ ११ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्यानेच झाली़ रमजान ईद या सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देणे दिवसभर सुरु होते़ त्याचबरोबर गुलगुले, शिरखुर्मा, भजे, शंकरपाळे, चिवडा अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत यंदाची ईद उत्साहात साजरी झाली़ नातेवाईक व इष्टमित्रांनीही या गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेतला़ गळाभेट घेऊन ईदच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात होत्या़ शिवाय ईदगाह मैदानाच्या मुख्य रस्त्यावर शुभेच्छांचे फलकही लागले होते़
देशाचे वातावरण पोषक राहण्यासाठी सर्वांनी भाईचारा जपायला हवा़ त्यातूनच सर्व लोकांचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली़ पाऊस नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत़ पावसाअभावी शेतकरी संकटात आहेत़ या संकटातून बाहेर पडण्यासाठी देव मदत करेल, पाऊसही पडेल, अशी प्रार्थना यावेळी मौलाना ईस्माईल कास्मी यांनी केली़ यावेळी हजारो मुस्लिम बांधव व हिंदू बांधव प्रार्थनास्थळी उपस्थित होते़

Web Title: Recite to Allah for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.