रखडलेल्या कामांचे मनपाकडून पुनर्विलोकन
By Admin | Updated: December 18, 2015 00:16 IST2015-12-18T00:03:29+5:302015-12-18T00:16:51+5:30
औरंगाबाद : मंजुरीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आतापर्यंत सुरुवात न झालेल्या विकासकामांचे आता महानगरपालिकेकडून पुनर्विलोकन होणार आहे.

रखडलेल्या कामांचे मनपाकडून पुनर्विलोकन
औरंगाबाद : मंजुरीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आतापर्यंत सुरुवात न झालेल्या विकासकामांचे आता महानगरपालिकेकडून पुनर्विलोकन होणार आहे. प्रभारी आयुक्तांनी अशा सर्व कामांची यादी तात्काळ सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यादीच्या छाननीनंतर अत्यावश्यक वाटतील तेवढीच कामे कायम ठेवली जाणार असून, उर्वरित कामांना मात्र फाटा दिला जाणार आहे. त्यामुळे सुमारे २० कोटी रुपयांची कामे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महानगरपालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर केली जातात; परंतु गेल्या काही वर्षांत पालिकेची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे सर्वच कामांना निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे दरवर्षी काही मंजूर कामे तशीच राहतात. अशा कामांची संख्या खूप आहे.
आता या कामांचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे मंजूर तरतुदीत ही कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे या कामांचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय प्रभारी आयुक्तांनी घेतला आहे.
त्याबाबत आयुक्तांनी सर्व विभागांकडून सुरू न झालेल्या मंजूर कामांची यादी मागविली आहे. ज्या कामांना मंजुरी मिळून दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे; परंतु त्यांना आतापर्यंत सुरुवातही झालेली नाही अशाच कामांची यादी सादर करण्याच्या सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत.
तसेच एखाद्या कामाचा खर्च खूपच वाढलेला असेल आणि आजच्या परिस्थितीत त्या कामावर तेवढा खर्च करणे परवडणारे नसेल तर तशी कामेही रद्द करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सद्य:स्थितीत मंजूर कामांपैकी एकूण ७० कोटी रुपयांच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणे बाकी आहे. त्यातील किमान २० कोटी रुपयांची कामे रद्द होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.