विद्यापीठांचे राष्ट्रीय स्तरावर रँकिंग; ‘बामु’ही प्रयत्नशील
By Admin | Updated: December 24, 2015 00:01 IST2015-12-23T23:46:18+5:302015-12-24T00:01:38+5:30
औरंगाबाद : नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय रँकिंग घोषित करण्यात येणार आहे.

विद्यापीठांचे राष्ट्रीय स्तरावर रँकिंग; ‘बामु’ही प्रयत्नशील
औरंगाबाद : नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांचे आंतरराष्ट्रीय रँकिंग घोषित करण्यात येणार आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व संशोधक विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून उत्कृष्ट मानांकन मिळविण्यात आपण यशस्वी होऊ, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘इंटर क्वॉलिटी अॅश्युरन्स सेल’(आय क्वॅक) च्या माध्यमातून आयोजित बैठकीत ते बोलत होते. मंचावर बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ.महेंद्र शिरसाट, ‘आय क्वॅक’ चे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर यांची उपस्थिती होती. बैठकीस २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते. यावेळी कुलगुरू म्हणाले, आपले विद्यापीठ ग्रामीण स्तरावरील ‘अ’ मानांकन मिळविणारे पहिले विद्यापीठ आहे. मूलभूत संशोधन व नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवून आपला हा दर्जा टिकवितानाच नव्या मानांकनातही आपले स्थान मिळवायचे आहे. त्यामुळे येत्या २७ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाचा प्रस्ताव संबंधित संस्थेकडे पाठविण्यात येईल.
या कार्यक्रमात मानांकनाची पद्धती ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ च्या माध्यमातून डॉ. धारूरकर यांनी सादर केली. ते म्हणाले, मूल्यांकनात ४० टक्के भाग हा संशोधन कार्यावर आहे. तसेच अध्ययन, अध्यापन प्रणालीस ३० टक्के महत्त्व देण्यात आले आहे. बाह्य प्रभाव व सर्वसमावेशकता यास १५ टक्के , शैक्षणिक समज व दृष्टिकोन यासाठी १० टक्के तर पदवीधर विद्यार्थ्यांचा दर्जा यासाठी ५ टक्के याप्रमाणे मानांकन करण्यात येणार आहे. येत्या १ एप्रिल २०१६ रोजी सदर मानांकन घोषित करण्यात येणार आहे. डॉ. काळे यांनी प्रास्ताविकात या संस्थेच्या स्थापनेबद्दल व विद्यापीठाच्या तयारीचा आढावा घेतला. तर डॉ. शिरसाठ यांनी या प्रस्तावासाठी भरण्यात येणाऱ्या माहितीबद्दल मार्गदर्शन केले. आगामी काळात जगातील टॉप २०० विद्यापीठांत भारतीय विद्यापीठाचा समावेश मोठ्या प्रमाणात होण्यास हे प्रतिमान पूरक ठरेल, असेही डॉ. शिरसाट म्हणाले.