रमजानपुरती अखंड वीज; भारनियमन सध्या लांबले
By Admin | Updated: June 14, 2016 23:55 IST2016-06-14T23:29:13+5:302016-06-14T23:55:22+5:30
औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

रमजानपुरती अखंड वीज; भारनियमन सध्या लांबले
औरंगाबाद: वीजचोरी वाढल्यामुळे शहरात लोडशेडिंग लागू करण्याची तयारी सुरू झाली असली तरी तूर्तास रमजान महिन्यामध्ये मात्र महावितरणकडून अखंड वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही या काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने कळविले आहे.
जिल्ह्यात काही दिवसांपासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. शहरातही तांत्रिक कारणांमुळे वीज गुल होत आहे. त्यात आता मुस्लिम धर्मियांचा रमजान महिना सुरू झाला आहे.
या काळात मुस्लिम धर्मीय दिवसभर कडक उपवास करतात. केवळ सूर्योदयापूर्वी आणि सूर्याेदयानंतरच ते जेवण घेतले जाते. त्यामुळे या काळात वीजपुरवठा खंडित झाल्यास गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने ७ जून ते ६ जुलै या कालावधीत २४ तास वीज सेवा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तोपर्यंत अ, ब, क, ड, ई, फ आणि जी गटातील सर्व फिडर आणि सिंगल फेजिंगच्या फिडरवर असलेले फिडर भारनियमन रद्द करण्यात आले आहे. मात्र, स्वतंत्र कृषी वाहिनीवरील आणि सिंगल फेजिंग वाहिनीवरील कृषिपंपांना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे महावितरणने म्हटले आहे. दरम्यान, शहरात वीज चोरीचे प्रमाण ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचल्यामुळे महावितरणकडून या ठिकाणी लोडशेडिंग लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. चोरीचे प्रमाण कमी न झाल्यास रमजाननंतर शहरात लोडशेडिंग लागू होण्याची दाट शक्यता आहे.
...तर ९ तासांपर्यंतचे भारनियमन
महावितरणच्या शहरातील ८४ पैकी ७६ फिडरवर ४२ ते ७५ टक्क्यांपर्यंत वीज हानी होते आहे. वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनुसार या सर्वच ठिकाणी भारनियमन लागू होऊ शकते.
तसे झाल्यास या फिडरवर सरासरी ६ तासांपासून ९.१५ तासांपर्यंत भारनियमन होऊ शकेल, असे महावितरणने कळविले आहे.
भारनियमन टाळण्यासाठी ग्राहकांनी वीजचोरी न करता नियमितपणे बिल भरावे असे आवाहनही महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.