पावसाचा महिना सरला; नालेसफाई कागदावरच !
By Admin | Updated: June 23, 2016 01:14 IST2016-06-23T00:22:26+5:302016-06-23T01:14:54+5:30
लातूर : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या आकाराचे नाले बांधलेले आहेत. नाले साफ केले नसल्यामुळे अनेकदा अनेक वस्त्यांतील

पावसाचा महिना सरला; नालेसफाई कागदावरच !
लातूर : पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील विविध भागांत मोठ्या आकाराचे नाले बांधलेले आहेत. नाले साफ केले नसल्यामुळे अनेकदा अनेक वस्त्यांतील घरांत पावसाचे पाणी घुसल्याचा पूर्वानुभव आहे. तरीही मनपा प्रशासनाचे यंदा नाले सफाईकडे दुर्लक्षच आहे. काही नगरसेवकांनी दोन महिन्यांपूर्वी हमला पद्धतीने नालेसफाई करावी, अशी मागणी केली. परंतु, अद्याप या मोहिमेला प्रारंभ झाला नाही. आता पावसाचा एक महिना उलटत आला तरी नालेसफाईकडे डोळेझाक आहे.
शहरातील क्वाईल नगर, समता नगर, मंत्री नगर, बस्तापुरे नगर, नारायण नगर आदी सखल भागांमध्ये नाले साफ केले नसल्यामुळे अनेकवेळा पावसाचे पाणी घरात घुसून जनजीवन विस्कळीत झाले होते. क्वाईल नगर झोपडपट्टीतील नागरिकांना मागे एकदा घरात पाणी घुसल्याने स्थलांतर करण्याची वेळ आली होती. केवळ नाल्यांची स्वच्छता न केल्याने ही परिस्थिती ओढवली होती. हा पूर्वानुभव लक्षात घेता मनपाने पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करणे आवश्यक होते. मात्र या सफाईच्या कामाला अद्याप प्रारंभ झाला नाही. गंजगोलाईच्या पूर्व भागांतील काही नगरांमध्ये सफाई करण्यात आली आहे. परंतु, सध्या मनपाचे जेसीबी यंत्र वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यासाठी नेले आहेत. त्यामुळे मोठ्या नाल्यांची सफाई रखडली असल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांत खड्डे खोदून झाल्यानंतर या जेसीबी यंत्राद्वारे मोठ्या नाल्यांची सफाई केली जाणार आहे. सद्य:स्थितीत मात्र नालेसफाईचे काम बंद आहे. काही नगरसेवकांच्या मागणीमुळे पंधरा दिवसांपूर्वी काम करण्यात आले होते. तेही मोजक्याच भागांत करण्यात आले आहे. त्यानंतर खड्डे खोदण्याच्या नावाखाली हे काम बंद झाले आहे. मोठ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या नाल्यांमधून पाण्याचा निचराच होऊ शकत नाही. एक-दोन मोठे पाऊस झाले तर नाले तुंबून घरात पाणी घुसण्याची शक्यता आहे. याबाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा पाऊस झाला नसल्यामुळे मनपा बेफिकीर दिसत आहे.