गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यातही पाऊस
By Admin | Updated: July 10, 2014 01:15 IST2014-07-10T00:59:22+5:302014-07-10T01:15:53+5:30
औरंगाबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून फुलंब्री व सिल्लोड तालुका वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली होती.

गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यातही पाऊस
औरंगाबाद : गेल्या दोन-तीन दिवसांपासून फुलंब्री व सिल्लोड तालुका वगळता इतर तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली होती. बुधवारी या तालुक्यातही पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पेरण्यांना वेग येणार आहे.
गंगापूर : गंगापूर शहर व परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी ३ वाजता हलक्या स्वरूपात सरी पडायला सुरुवात झाली. ४ वाजेनंतर जोराचा पाऊस सुरू झाला. तालुक्यातील जामगाव, कायगाव, बगडी, ममदापूर, मांजरी, ढोरेगाव, अगरवाडगाव, लिंबेजळगाव, कानडगाव, वाडगाव, शेंदुरवादा, सावखेडा आदी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.
वैजापूर : वैजापूर शहरासह तालुक्याच्या बहुतांश ग्रामीण भागात पावसाने बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. यंदाच्या हंगामात पावसाने पहिल्यांदाच हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, या पावसाने खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; परंतु तालुक्यात पाऊस न पडल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या.
याशिवाय तालुक्यातील नारंगी मध्यम प्रकल्पासह भटाणा, बोर दहेगाव, कोल्ही, गाढेपिंपळगाव व सटाणा हे लघु व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरींसह खाजगी विहिरींचे जलस्रोत कमी झाल्याने गावागावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जून महिना पूर्णपणे कोरडा गेला. जुलै उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत होती; परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी व आज तालुक्याच्या काही भागांत धो-धो पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला.
बुधवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वैजापूर शहरासह घायगाव, जांबरगाव, म्हस्की, नांदगाव, चांडगाव, रोटेगाव, आघूर व परिसरात मध्यम पावसाला सुरुवात झाली. नंतर पावसाचा वेग वाढला. साधारणत: कमी-जास्त विश्रांती घेत दोन तास पाऊस सुरू होता.
रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या सर्वांनाच दिलासा मिळाला. खरीप लागवडीसाठी हा पाऊस पुरेसा असल्याने लागवडीला आता वेग येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
आषाढी एकादशी पावली
कन्नड : तालुक्यातील काही भागांत समाधानकारक, तर काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. आषाढी एकादशीला पाऊस पडतो, असे वृद्ध मंडळी सांगतात, त्याचा प्रत्यय आला. थोडक्यात, एकादशी पावली असेच म्हणावे लागेल. तालुक्यातील चिकलठाण, चापानेर, वासडी या परिसरात समाधानकारक पाऊस पडला. या पावसामुळे या भागात पेरण्यांना सुरुवात होईल, तर विहिरीतील पाण्यावर लावलेल्या कापसाला पावसामुळे आधार झाला आहे.