एक चतुर्थांशच पाऊस
By Admin | Updated: July 21, 2014 00:25 IST2014-07-20T23:23:24+5:302014-07-21T00:25:00+5:30
जालना : जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ एक चतुर्थांश इतकाच पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली

एक चतुर्थांशच पाऊस
जालना : जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अपेक्षित सरासरीच्या केवळ एक चतुर्थांश इतकाच पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईबरोबरच खरिपाची आतापर्यंत झालेली पेरणी वाया जाते की, काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी या तारखेपर्यंत २४४ मि.मी. पाऊस झाला होता. मात्र यावर्षी केवळ ६६.५३ मि.मी. पावसाची नोंद आहे.
पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत शासनाच्या सुचनेनुसार पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाईसंदर्भात सर्वतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील पाणीसाठा आरक्षित करण्यात आला असून पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासून, त्यातून पुढील नियोजन करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ गावे आणि १४ वाड्यांना ३७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. १२८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७८ हजार २५३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
यापैकी ५२ हजार हेक्टर क्षेत्र केवळ कपाशीचे आहे. मूग, उडीद या पिकांचे क्षेत्र कमी होणार आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के खरीप पीक कर्जाचे वाटप झाले आहे. सप्टेंबर २०१४ पर्यंत पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून टंचाईसंदर्भातील बैठका घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जलसाठा असलेल्या ठिकाणाहून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी तहसीलदारांना कडक निर्देश दिलेले आहेत. शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून मोठ्या अपेक्षेने पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी)
सर्व प्रकल्पांतील जलसाठा आरक्षित
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करणे तसेच टँकरची संख्या वाढविण्याचे काम होत आहे. मात्र त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजनही करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत ज्या धरणांमध्ये पाणी आहे, ते आरक्षित ठेवण्यात आले आहे.
जालना शहराला जायकवाडी, घाणेवाडीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये शहराच्या काही भागात पाणीपुरवठा झालेला नाही.
तालुकावार्षिक सरासरी अपेक्षित सरासरी झालेला पाऊस
जालना६८६.२०२६१.४४८६.३८
बदनापूर६८५.४०२८८.०६३८.८०
भोकरदन६६२.८०२६०.११७७.५१
जाफराबाद६४०.२०२३४.२०४५.००
परतूर७४६.६०२३८.८५११८.८०
मंठा७१२.९०२३३.८१३५.५०
अंबड६६३.९०२१९.१९६९.८६
घनसावंगी७०७.७०२४०.२३५४.४६
एकूण६८८.२९२४४.२३६६.५३