तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून राडा
By Admin | Updated: August 17, 2015 00:05 IST2015-08-17T00:05:04+5:302015-08-17T00:05:04+5:30
आखाडा बाळापूर : तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याच्या कारणावरून १५ आॅगस्टला आखाडा बाळापूरच्या ग्रामसभेतच राडा झाला. दोन गट समोरासमोर भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली.

तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून राडा
आखाडा बाळापूर : तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडण्याच्या कारणावरून १५ आॅगस्टला आखाडा बाळापूरच्या ग्रामसभेतच राडा झाला. दोन गट समोरासमोर भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी शिवसेना व काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर परस्परांविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
बाळापूर येथील ग्रामपंचायत निवडणुक मोठी अटीतटीची झाली. काँग्रेस आणि सेनेच्या पॅनलमध्ये काट्याची टक्कर होती. तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष म. झिया कुरेशी ग्रा. पं. निवडणुकीत विजयी झाले. ते सरपंचपदाचे दावेदार असून त्यांची निवड होण्यास केवळ औपचारिकता बाकी आहे. १५ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजता ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. ग्रामसभेत तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली. कोरम पूर्ण आहे की नाही? या कारणावरून दोन गटात बाचाबाची सुरू झाली. वाकयुद्धात शिव्यांचा वापर झाल्याने प्रकरण मारामारीवर आले. तीनशे ते साडेतीनशेचा जमाव मारामारी करीत पळू लागला. यामध्ये कोण कोणाला मारत होते हे लक्षात येत नव्हते. या घटनेमुळे अचानक गावात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी शिवचरण विजयकुमार गोयंका यांच्या फिर्यादीवरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, विजय बोंढारे दत्ता बोंढारे, नागेश बोंढारे, गोविंद बोंढारे, रूखमाजी हेंन्द्रे, संदीप बोंढारे व इतर अनोळखी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ‘आम्ही ग्रामसभेस हजर नसताना ग्रामसभा का? घेतली या कारणावरून ग्रामसभेत गोंधळ घातला. थापडबुक्यांनी व खुर्च्यानी मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याच प्रकरणी परस्परांविरोधी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘आम्ही तंटामुक्त अध्यक्षांची निवड करताना तू मध्ये मध्ये करून गोंधळ घालत आहेस म्हणून लोखंडी रॉडने व थापडबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी गोविंद भीमराव बोंढारे यांच्या फिर्यादीवरून शिवचरण गोयंका, मोहनसिंग बयास, डॉ. संतोष बोंढारे, संजय इंगळे, रोहित गोयंका, लक्ष्मीकांत गोयंका, अझहरखाँ पठाण व चार ते पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शेषेराव राठोड करीत आहेत. या घटनेनंतर बाळापूर व्यापारपेठेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली येथून जादा पोलिस कुमक मागवून वातावरण शांत करण्यात आले. अप्पर पोलिस अधीक्षक नामदेव मिठ्ठेवाड यांनी भेट दिली. तसेच सेना व काँगे्रसच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने कोणाची भेट घेण्याऐवजी त्यांनी व्यापारपेठेतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही गावाला भेट दिली. (वार्ताहर)