छत्रपती संभाजीनगर : देवळाई-सातारा येथील साई टेकडी वरचा परिसर हा वन क्षेत्रात येतो. या परिसरात नागरिकांनी विनापरवानगी प्रवेश केल्यास आणि मद्यप्राशन केल्यास वन्यजीव आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. वन विभागाने यापूर्वीच कठोर सूचना दिल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक रविवारची सुटी साजरी करण्यासाठी या निसर्गरम्य पण संवेदनशील परिसरात मद्यप्राशन करत असल्याचे प्रकार पुन्हा समोर आले आहेत. अशांना जागेवरच ‘उठबशा’ काढण्यास भाग पाडले आहे.
१ जून, रविवार रोजी वन परिमंडळ अधिकारी अविनाश राठोड यांनी गस्त पथकासह साई मंदिर, वन परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या काही व्यक्तींना रंगेहाथ पकडले. हे सर्वजण वनक्षेत्रात ‘ओली पार्टी’ करत होते. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत संबंधित व्यक्तींना दंड ठोठावला. विशेष म्हणजे, आर्थिक दंडाबरोबरच शिक्षेचा भाग म्हणून त्यांना जागेवरच ‘उठबशा’ काढण्यास भाग पाडले.
वन क्षेत्रात मद्यप्राशन करणे, प्लास्टिक व कचरा टाकणे, विनापरवानगी भटकंती करणे, हे वन कायद्यानुसार दंडनीय गुन्हे आहेत. या प्रकारांमुळे फक्त पर्यावरणाची हानी होते असे नव्हे तर नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते, त्यामुळे येथे फिरणे धोकादायक ठरू शकते. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वन क्षेत्रात फिरण्यासाठी अधिकृत परवानगी घ्या. मद्यप्राशन, ध्वनिप्रदूषण आणि कचरा टाकणे टाळा. वन्यप्राण्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप टाळणे आपल्याच सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.
या कारवाईमुळे इतर नागरिकांनाही चांगला धडा मिळाला असून, वन विभागाने याविषयी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पुढील काळात अशा गैरप्रकारांवर अधिक कडक कारवाई होणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. आता पुन्हा येणार नसल्याची शपथ घेतल्यानंतर समज देऊन सोडण्यात आले.