मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा

By Admin | Updated: July 28, 2015 01:18 IST2015-07-28T00:43:51+5:302015-07-28T01:18:35+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटदेखील ओढवले आहे.

Provide grants to farmers in Marathwada | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा


औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकटदेखील ओढवले आहे. त्यामुळे आठही जिल्ह्यांतील केशरी रंगाच्या शिधापत्रिका असलेल्या दारिद्र्य रेषेवरील सुमारे १० लाख शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोप्रमाणे गहू शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. १ आॅगस्टपासून याचा पुरवठा सुरू होण्याची शक्यता असून, जास्तीच्या धान्याची मागणी नोंदविण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पुरवठा विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. जूननंतर राज्यातील अनेक भागांत पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. यंदाही दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होऊ नये, यादृष्टीने विभागातील आठ जिल्हे आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद विभागांत यासंबंधी आदेश जारी झाले असून, यंत्रणा कामाला लागली आहे.
पुरवठा अधिकारी संजय जाधवर म्हणाले, २५ टक्के लाभार्थी वाढण्याची शक्यता आहे. धान्य साठा वाढेल, त्यासाठी मागणीदेखील नोंदवावी लागेल. १ आॅगस्टपासून किंवा त्यापुढील आठवड्यापासून वितरण सुरू होऊ शकते. या निर्णयामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. विभागातील १० लाख शेतकऱ्यांना या योजनेतून धान्य पुरवठा होऊ शकेल.
एपीएल (केसरी) रेशनकार्ड असलेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो या परिमाणात धान्य देण्यात येईल. केंद्र शासनाकडून इकॉनॉमिक कॉस्टने अ दर्जाचा तांदूळ व गहू खरेदी करून शेतकऱ्यांना अनुक्रमे ३ व २ रुपये किलो या दराने देण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता.

Web Title: Provide grants to farmers in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.