समृद्धी महामार्गामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:05 IST2021-06-16T04:05:01+5:302021-06-16T04:05:01+5:30

पावसाचे पाणी शिरले शेतीत: नुकसान पाहणीचे आदेश औरंगाबाद: जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाला ...

The Prosperity Highway changed the natural flow | समृद्धी महामार्गामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला

समृद्धी महामार्गामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला

पावसाचे पाणी शिरले शेतीत: नुकसान पाहणीचे आदेश

औरंगाबाद: जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात झालेल्या पावसात शहरालगतच्या भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या तीन गावांतील शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला सोमवारी दिले. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शहरालगतच्या गावात पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचा आढावा व उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार ज्योती पवार, समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, प्रकल्प अधिकारी शंकरा उपस्थित होते. पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने, डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेजारील गावातील शेतात शिरून पिकांचे नुकसान झाले. यापुढील अशा घटना रोखण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश चव्हाण यांनी दिले.

७० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पंचनामे केले असल्याचे तहसीलदार पवार यांनी सांगितले. या नुकसानीत भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या गावांतील अंदाजे ७० शेतकऱ्यांच्या जवळपास २० हेक्टर शेतजमिनीवरील फळपिके व कांदापिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

Web Title: The Prosperity Highway changed the natural flow