रिक्त होणाऱ्या पदाच्या ‘अगेन्स्ट’ पदोन्नती

By Admin | Updated: July 4, 2014 01:12 IST2014-07-04T00:58:23+5:302014-07-04T01:12:07+5:30

औरंगाबाद : भविष्यात सहा महिन्यांनी रिक्त होणाऱ्या पदावर जिल्हा परिषदेने सहा महिने अगोदरच कर्मचाऱ्यास पदोन्नती देऊन प्रशासनातील सहकाराचा आदर्श घालून दिला आहे;

Promotion of 'Emergency' promotion | रिक्त होणाऱ्या पदाच्या ‘अगेन्स्ट’ पदोन्नती

रिक्त होणाऱ्या पदाच्या ‘अगेन्स्ट’ पदोन्नती

औरंगाबाद : भविष्यात सहा महिन्यांनी रिक्त होणाऱ्या पदावर जिल्हा परिषदेने सहा महिने अगोदरच कर्मचाऱ्यास पदोन्नती देऊन प्रशासनातील सहकाराचा आदर्श घालून दिला आहे; परंतु पदस्थापना दिलेले पद पुढील सहा महिने रिक्त होणार नसल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यास त्याच जागेची हमी म्हणून प्रशासनाने पदोन्नतीचे पत्र देऊन सदर ‘क्लेम सेटल’ केला आहे.
सूत्रांनी सांगितले की, औरंगाबाद पंचायत समितीमध्ये कार्यरत वरिष्ठ सहायक श्रीमती ए.बी. सूर्यवंशी यांना ज्येष्ठतेनुसार कार्यालयीन अधीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांची पदस्थापना सिल्लोड पंचायत समितीत करण्यात आली होती; परंतु सूर्यवंशी सदर ठिकाणी रुजू झाल्या नाहीत. त्यांनी मुख्यालयासाठीच आग्रह धरला. सूर्यवंशी यांची मूळ नेमणूक खुल्या प्रवर्गातून झालेली आहे; परंतु त्यांना समांतर आरक्षणातून अपंग प्रवर्गातून (अल्पदृष्टी) पदोन्नती देण्यात आली आहे. हाच धागा पकडून सूर्यवंशी यांनी अपंग व असहाय असल्याने औरंगाबाद शहराबाहेर पदस्थापना घेण्यास नकार दिला होता.
सूर्यवंशी यांच्या विनंतीवरून त्यांच्या पदस्थापनेत प्रशासनाने दि.१८ जून २०१४ रोजी बदल करून त्यांना पदोन्नतीसह कृषी विभागात पदस्थापना दिली; परंतु येथे अडचण अशी झाली की, कृषी विभागात कार्यालयीन अधीक्षकाचे पद रिक्त नाही.
सध्या या पदावर श्रीमती खांड्रे कार्यरत आहेत. त्या दि.३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या जागेवर पदोन्नती दिली तरी चालेल, असा आग्रह सूर्यवंशी यांनी धरला होता.
त्यानुसार प्रशासनाने त्यांना दि.१८ जून रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ३०-११-२०१४ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या संभाव्य रिक्त होणाऱ्या पदावर पदस्थापना करण्यात येत आहे.’
केवळ माणुसकी म्हणून
श्रीमती सूर्यवंशी यांनी अगोदर अपंगत्वाबद्दल कळविले नव्हते. त्यामुळे त्यांची बदली पदोन्नतीसह सिल्लोडला करण्यात आली; परंतु त्यांची परिस्थिती पाहून केवळ माणुसकी म्हणून त्यांच्या बदलीत अंशत: बदल करण्यात आले आहेत. यात कोठेही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. रिक्त नसलेल्या एखाद्या जागेवर सहा महिने अगोदर असे पत्र देणे संयुक्तिक वाटत नाही; परंतु एका महिलेची सोय फक्त पाहण्यात आली आहे.
-दीपक चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी
‘त्या’ पंचायत समितीत कार्यरत
सदर जागेवर रुजू झाल्याशिवाय पदोन्नतीचे कोणतेही लाभ मागणार नाही, असे पत्र श्रीमती सूर्यवंशी यांच्याकडून आम्ही घेतले आहे. तसेच त्यांच्या पत्रातही तशा अटी स्पष्ट घालण्यात आल्या आहेत. सध्या त्या पंचायत समितीमध्येच कार्यरत आहेत. पदोन्नतीचे कोणतेही लाभ सध्या त्यांना देण्यात आलेले नाहीत.
-श्याम भाले, कार्यालयीन अधीक्षक, सामान्य प्रशासन विभाग

Web Title: Promotion of 'Emergency' promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.