सीसीआय केंद्रावर १७ नोव्हेंबरपासून ४७ हजार क्विंटल कापसाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:26 IST2020-12-17T04:26:17+5:302020-12-17T04:26:17+5:30
गारज : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या चोरवाघलगाव व शिऊर बंगला येथील तीन सीसीआय केंद्रावर दररोज अडीचशे ...

सीसीआय केंद्रावर १७ नोव्हेंबरपासून ४७ हजार क्विंटल कापसाची खरेदी
गारज : वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या चोरवाघलगाव व शिऊर बंगला येथील तीन सीसीआय केंद्रावर दररोज अडीचशे वाहनांची आवक आहे. विशेष म्हणजे १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या तीनही केंद्रात तब्बल सत्तेचाळीस हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या विशेष प्रयत्नातून हे केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांचा कापसाला योग्यवेळी योग्य भाव मिळू लागल्याने आनंदाचे वातावरण आहे.
आ. बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही सीसीआय केंद्र सुरू झाले आहेत. येथे दररोज अडीचशे ते तीनशे वाहनांची आवक सुरु करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख दिपक आहेर हे स्वत: प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवीत आहेत. येणार्या वाहनधारकांशी तसेच शेतकर्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकाचे निरसन केले जात आहे. त्यामुळे कपाशीच्या एकाही वाहनाला मुक्कामी राहण्याची वेळ येत नाही. परिणामी शेतकर्यांना गाडी मालकांना द्यावा लागणारा अधिकच्या मावेजातून सूट झाली आहे.
केंद्राची क्षमता संपली, चार दिवस कापूस खरेदी बंद
आमदार प्रा. रमेश पाटील बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांच्या देखरेखीखाली कापूस खरेदी केली जात आहे. शेतकर्यांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी केंद्रचालक बारकाईने काम करीत आहेत. परंतू सध्या येथील तीनही कापूस खरेदी केंद्राची क्षमता संपली आहे. कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येऊ लागल्याने कापूस ठेवायचा कुठे असा प्रश्न पडला आहे. त्यात सततच्या वातावरण बदलामुळे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी पुढील चार दिवस कापूस खरेदी बंद ठेवली जाणार आहे.
--------
फोटो - वैजापूर तालूक्यातील शिऊर बंगला येथील सीसीआय केंद्रावर लागलेल्या कपाशीच्या गाड़्या.