बियाणांची कृत्रिम टंचाई रोखा
By Admin | Updated: May 14, 2014 23:59 IST2014-05-14T23:14:50+5:302014-05-14T23:59:19+5:30
जालना : २०१४ च्या खरीप हंगामात बियाणांची कृत्रिम टंचाई होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली.

बियाणांची कृत्रिम टंचाई रोखा
जालना : २०१४ च्या खरीप हंगामात बियाणांची कृत्रिम टंचाई होणार नाही, यासाठी कृषी विभागाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केली. जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात बुधवारी आयोजित खरीपपूर्व हंगाम २०१४ च्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा आशा भुतेकर, आ. सुरेशकुमार जेथलिया, आ. संतोष सांबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कृषी अधीक्षक उमेश घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री टोपे पुढे म्हणाले की, खताचे आवंटन १ लाख २४ हजार मे.टन आहे. मात्र सोयाबीनचे क्षेत्र यंदा वाढणार असल्याने त्यासाठी लागणार्या बियाणांची टंचाई भासू शकते. यापूर्वी ज्या शेतकर्यांनी सोयाबीनची लागवड केली असेल, त्यांनी त्याच बियाणांचा वापर करावा, अशा सूचना कृषी विभागानेच दिलेल्या आहेत. पतपुरवठा उद्दिष्टापेक्षा जास्त व्हावा, यासाठी बँकर्सने लक्ष दिले पाहिजे, असे सांगून टोपे म्हणाले, खराब बियाणांची विक्री कुठे होत असल्यास संबंधितांवर कृषी विभागाने ठोस कारवाई करावी. ठिबकचे प्रलंबित अनुदान तातडीने मिळावे, याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही टोपे यांनी दिली. आ. जेथलिया यांनी बियाणांची कृत्रिम टंचाई जाणवू नये, यासाठी कृषी विभागाने आतापासूनच कडक उपाययोजना केली पाहिजे, अशी सूचना केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडितराव भुतेकर यांनी चाराटंचाई भासू नये, याबाबत कृषी विभागाला सूचना देण्याची मागणी केली. बाबासाहेब आकात, सोपान तिरूखे यांनी काही सूचना केल्या. यंदा ६ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी होणार आहे. कापसाचे क्षेत्र ५० टक्के असून सोयाबीनचे क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टर राहील, असा अंदाज आहे. मक्याचे क्षेत्र ७० हजार हेक्टर आहे. गतवर्षी सोयाबीनचे क्षेत्र ७० हजार हेक्टर होते. ते यावेळी वाढणार आहे. सांबरेंनी धारेवर धरले आ. संतोष सांबरे यांनी यावेळी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. बैठकीस गैरहजर अधिकार्यांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी सर्वप्रथम केली. गारपिटीचे पंचनामे बोगस झाले, कृषी विभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप सांबरे यांनी केला. ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले, त्यांच्याऐवजी पैसे घेऊन दुसर्याच शेतकर्यांना मदत दिली. गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे गहू, ज्वारी, सोयाबीन हे खराब झालेले आहेत. या खराब धान्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करावे व हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी सांबरे यांनी केली. जेथलियांनी घेतली फिरकी आ. सांबरे यांचे भाषण दीर्घकाळ सुरू असताना पालकमंत्री टोपे आणि आ. जेथलिया यांच्यातील चर्चाही रंगली होती. सांबरे यांनी माईक ठेवताच, जेथलिया म्हणाले, १६ तारखेला समोर ठेवून सांबरेंचे भाषण जोशपूर्ण झाले. केंद्रात काय व्हायचे ते होईल, परंतु टोपे हे आॅक्टोबरमध्येही मंत्री म्हणूनच कार्यरत राहणार आहेत, असे म्हटल्याने सभागृहात एकच हशा पिकला. ‘साहेब लग्नाला गेले’ या बैठकीस काही गटविकास अधिकारी व महावितरणचे अधिकारी गैरहजर होते. जालन्याचे गटविकास अधिकारी एम.पी. पोहरे हे गैरहजर असल्याने त्यांचे प्रतिनिधी म्हणून एक अधिकारी उभे राहिले, तेव्हा टोपे यांनी बीडीओ कुठे? असा सवाल केला. त्यावर संबंधित अधिकार्यांनी ‘साहेब लग्नाला गेले’ असे उत्तर देताच, टोपे म्हणाले, आज लग्नाचा मुहूर्त आहे का? मला तर एकही पत्रिका आली नाही, असे सांगून खोटी उत्तरे देत जाऊ नका, असे बजावले.