प्रवेशोत्सवाची जिल्ह्यात तयारी
By Admin | Updated: June 15, 2014 00:32 IST2014-06-15T00:15:31+5:302014-06-15T00:32:43+5:30
परभणी : १६ जून रोजी शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असून, प्रत्येक शाळेने प्रवेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी दिल्या़
प्रवेशोत्सवाची जिल्ह्यात तयारी
परभणी : १६ जून रोजी शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असून, प्रत्येक शाळेने प्रवेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी दिल्या़
जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे़ या प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी १३ जून रोजी सिटी क्लब येथील हॉलमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़ बैठकीस जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, तालुका पर्यायी व आयडी विषयतज्ञ, गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़
पहिल्या सत्रामध्ये सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एऩडी़ भोसले, जिल्हा समन्वयक सी़बी़ ठाकरे, जी़एस़ मद्दे यांनी शाळांनी करावयाची पूर्वतयारी, प्रवेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले़ शाळाबाह्य मुलांचे शिक्षण, हंगामी, स्थलांतरित मुलांचे शिक्षण तसेच विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण याविषयीदेखील मार्गदर्शन केले़ दुपारच्या सत्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डुंबरे यांनी शाळांना सूचना केल्या़ त्यात १६ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे़ प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप केली जावीत़ विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे़ एकही मूल शाळेपासून वंचित राहू नये, याची दक्षता घ्यावी़ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना सर्वप्रथम शाळेत दाखल करावे़ शाळेत दाखल झालेल्या परंतु, गैरहजर असलेल्या शाळाबाह्य मुलांची रितसर यादी तयार करून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावी़ हंगामी कामासाठी स्थालंतरित होणाऱ्या सहा ते चौदा वयोगटातील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून ही यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सादर करावी़ पटनोंदणीचा अहवाल वेळोवेळी तालुकास्तरावरुन संचलित करून जिल्हास्तरावर सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या़
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील सी़ बी़ ठाकरे, बी़ जी़ भंवर, के़ बी़ शिंदे, विशाल तोगरे आदींनी परिश्रम घेतले़ बैठकीस जिल्ह्यातील १३२ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांनी घेतली प्रतिज्ञा
या बैठकीमध्ये उपस्थित मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांनी शंभर टक्के मुले शाळेत प्रवेशित करणे, एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही़
सर्वांना पाठ्यपुस्तक, गणवेश, शालेय पोषण आहार मिळेल, अशी प्रतिज्ञा घेतली़
उपशिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले़
निर्णयाचे वाचन
शिक्षणाधिकारी अशोक आठवले यांनी शासन निर्णयाचे वाचन करून शाळा प्रवेशोत्सव यशस्वीपणे राबवावा, अशा सूचना केल्या़