प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By Admin | Updated: January 3, 2016 00:01 IST2016-01-02T23:50:50+5:302016-01-03T00:01:57+5:30
औरंगाबाद : तो १९ वर्षांचा अन् ती १५ वर्षांची. दोघांनी घरच्यांच्या नकळत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या, पण नियतीला त्यांचे प्रेम मान्य नव्हते

प्रेमीयुगुलाची आत्महत्या
औरंगाबाद : तो १९ वर्षांचा अन् ती १५ वर्षांची. दोघांनी घरच्यांच्या नकळत प्रेमाच्या आणाभाका घेतल्या खऱ्या, पण नियतीला त्यांचे प्रेम मान्य नव्हते. तीन आठवड्यांपूर्वी कुटुंबियांनी तिचे लग्न ठरविले. तिनेही साखरपुडा होईपर्यंत ‘या कानाची खबर त्या कानाला’लागू दिली नाही; पण त्या दोघांच्या मनात वेगळेच काही तरी शिजत होते. ‘थर्टी फर्स्ट’च्या दिवशी ते दोघे एकत्र आले आणि त्यांनी ‘एक दुजे के लिए’ म्हणत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हर्सूलच्या जोगवाडा परिसरात शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
संजय कारभारी जाधव (१९) आणि सविता अप्पाराव बनसोडे (१५, दोघे रा. जोगवाडा परिसर) असे मृत प्रेमीयुगुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय जाधव हा बारावीमध्ये शिक्षण घेत होता. तर त्याच्या घरापासून काही अंतरावर राहणारी सविता ही वीटभट्टीवर कामाला जात होती. तिचे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते.
तीन आठवड्यांपूर्वीच सविताचा साखरपुडा झाला होता. कुटुंबियांनी आपल्या मनाविरुद्ध लग्न जमविल्याने तिला ते मान्य नसावे. त्यामुळे सविता आणि संजय यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला हे दोघेही घरातून बेपत्ता झाले. त्यांनी एकमेकाला घट्ट मिठी मारून जोगवाडा परिसरातील नरसिंग पवार यांच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, हर्सूल पोलीस ठाण्यात सविताचे अपहरण केल्याप्रकरणी संजयविरुद्ध तक्रार नोंदविली होती. तर संजय बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ विजय जाधव याने शुक्रवारी केली होती.
दरम्यान, आज सकाळी साडेआठच्या सुमारास पोलीस पाटलांना पवार यांच्या विहिरीत दोघांचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघांच्या मृतदेहाची घाटीत उत्तरीय तपासणी करण्यात आली. या घटनेची नोंद हर्सूल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संजय आणि सविता यांच्या प्रेम प्रकरणाबाबत कोणतीही कल्पना नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकारांना दिली.
कुटुंबियांचा लग्नाला विरोध असल्याने प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याच्या बऱ्याच घटना आजवर घडल्या आहेत; परंतु प्रेम प्रकरणाची कोणतीही माहिती कुटुंबियांना नव्हती.
कुटुंबियांच्या विरोधाची कल्पना नसताना देखील हर्सूलच्या जोगवाडा परिसरातील पे्रमीयुगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांपुढे काही प्रश्न निर्माण झाले आहेत.