पं.स. सदस्यांनी मासिक सभा उधळली
By Admin | Updated: May 22, 2014 00:10 IST2014-05-21T23:28:02+5:302014-05-22T00:10:30+5:30
माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळत बुधवारी पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभा उधळून लावली.

पं.स. सदस्यांनी मासिक सभा उधळली
माजलगाव : येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळत बुधवारी पंचायत समिती सदस्यांनी मासिक सभा उधळून लावली. पंचायत समिती सदस्य सुशील सोळंके यांनी अधिकार्यांना धारेवर धरले होते. माजलगाव पंचायत समितीला गटविकास अधिकारी असलेले पांढरे यांनी मनमानी कारभार चालविला आहे. यामुळे पंचायत समिती सदस्यांच्या मनामध्ये असंतोष खदखदत होता. तो आज मासिक सभेच्या निमित्ताने बाहेर पडला. गटविकास अधिकारी पांढरे यांचा इतर अधिकार्यांवर वचक राहिला नसल्यामुळे ते कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. दरम्यान कार्यालयात अनेक कामे खोळंबत आहेत. याचा फटका अनेकांना बसतो आहे. बुधवारी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू झाल्यानंतर पंचायत समिती सदस्य सुशील सोळंके यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मासिक बैठकीत घेतलेल्या कोणत्याच ठरावाची अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायतस्तरावरील शौचालयाचा निधी पडून असतानाही ग्रामसेवक गावात योजना राबवित नाहीत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची सर्व कामे बंद आहेत. पंचायत समिती कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कार्यालयात कर्मचारी कधी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे यापूर्वी समोर आलेले आहे. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. बैठकीच्या अॅजेंड्यावर कुठलाही विषय नसतो. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार यावेळी पंचायत समिती सदस्यांनी केला. या संदर्भात पंचायत समिती सदस्यांनी गटविकास अधिकारी पांढरे यांना जाब विचारला. परंतु त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. पंचायत समितीतील भोंगळ कारभाराला गटविकास अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप पंचायत समितीचे सदस्य भास्कर कचरे, जीवन राठोड , मोहनराव घाटुळ, सुदाम आगे, श्रीकृष्ण सोळंके, मधुकर देशमाने, सुशील सोळंके यांनी करत मासिक सभा उधळून लावली. जनतेची कामे करण्यास अडचण निर्माण होत आहे - सोळंके गटविकास अधिकार्यांच्या मानमानी कारभारामुळे विकास कामे रखडली आहेत. तसेच जनतेची कामे करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची प्रतिक्रिया सोळंके यांनी दिली. विकास कामे करण्याची इच्छा असतानाही अधिकारी अडसर ठरत आहेत. पांढरे यांची बदली करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचेही पंचायत समिती सदस्य सोळंके यांनी सांगितले. महिला सभापतीचे मौनव्रत पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती या दोन्ही महिला असल्याने त्या अधिकार्यांना काहीच बोलत नाहीत. मासिक बैठकीतही सर्व सदस्य गटविकास अधिकार्यांना बोलत असताना महिला सभापती व उपसभापती यांनी एकही शब्द काढला नाही. पंचायत समितीच्या सभापती असल्याने त्यांची जबाबदारी मोठी आहे. त्यांनी अधिकार्यांकडून कामे करून घ्यायला हवीत, असे न होता महिला सभापती मौनव्रत बाळगत आहेत. पं.स. सदस्य अधिकार्यांना विरोध करत आहेत.(वार्ताहर)