आरोग्य विभागाचे पोस्टमॉर्टेम

By Admin | Updated: June 18, 2014 01:35 IST2014-06-18T01:22:22+5:302014-06-18T01:35:35+5:30

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.

Postmortem of Health Department | आरोग्य विभागाचे पोस्टमॉर्टेम

आरोग्य विभागाचे पोस्टमॉर्टेम

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ग्रामीण भागात बिघडलेल्या आरोग्य व्यवस्थेचा पाढा वाचत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कुठे दिवसाच आरोग्य केंद्राला कुलूप ठोकून डॉक्टर-कर्मचारी गायब झाल्याचे, तर कुठे बायोमेट्रिक मशीन बंद दाखवून रजिस्टरवरच हजेरी नोंदविली जात असल्याची धक्कादायक बाब सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर प्रशासनाने दोन सहायक जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
स्थायी समितीची बैठक जि. प. अध्यक्षा शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनुपालन वाचन सुरू असताना आरोग्य केंद्रातील कर्मचारी संबंधित गावात राहत नसल्याचा मुद्या उपस्थित झाला. त्यावर दीपकसिंग राजपूत यांनी लाडगाव आणि लोणी खुर्द येथील बायोमेट्रिक मशीन लावल्यानंतर चार दिवसांतच ते बंद पडल्याचे सांगितले. मशीन मुद्दाम बंद पाडून एप्रिलपासून जुन्याच पद्धतीने हजेरी नोंदवून पगार काढल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच रजिस्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची वेळ एकच असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनीही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तालुका वाटपाचे आदेश काय गोपनीय काढले होते का, असा खोचक सवालही केला. तालुका आरोग्य अधिकारी यापुढे प्रत्येक बैठकीला हजर राहिले पाहिजेत, असेही बैठकीत सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बैठकीत नुसते पुतळ्यासारखे उभे राहत जाऊ नका, अशा शब्दांत फटकारले.
जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी किती आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक मशीन बंद आहेत, याची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही. मनोहर गवई, रामदास पालोदकर, ज्ञानेश्वर मोटे आदी सदस्यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
अंधारीच्या आरोग्य केंद्राला कुलूप
ज्ञानेश्वर मोटे यांनी अंधारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय उपस्थित केला. या ठिकाणी नेहमीच कर्मचारी गैरहजर राहतात, अशी तक्रार त्यांनी केली. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी लगेच गावातील ग्रामपंचायत सदस्याला फोन लावून आरोग्य केंद्रावर पाठविले.
बैठक सुरू असतानाच संबंधिताने आरोग्य केंद्राला कुलूप असल्याचा निरोप फोनवर दिला. तेव्हा दुपारचे ३ वाजले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी चौधरी यांनी या केंद्रावरील सर्वांचीच बिनपगारी सुटी टाकण्याचे आदेश दिले.
बायोमेट्रिक कशासाठी बसविले, त्यावर नोंद होत नसेल तर पगार काढता कसा, तालुक्यांची तपासणी होत नाही का, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यावेळी उपस्थितीत दोन सहजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तुमच्याकडे कोणकोणते तालुके आहेत, अशी विचारणा केली. या प्रश्नाचे उत्तर संबंधितांना देता आले नाही. सहजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बाविस्कर आणि डॉ. गोविंद चौधरी यांना नोटिसा बजावण्याचे आदेश सीईओ चौधरी यांनी दिले.

Web Title: Postmortem of Health Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.