कठड्यांअभावी पूल धोकादायक
By Admin | Updated: May 25, 2014 01:14 IST2014-05-25T00:39:55+5:302014-05-25T01:14:15+5:30
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत.
कठड्यांअभावी पूल धोकादायक
कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदा परिसरातील अनेक गावांना जोडणार्या रस्त्यावरील पुलांचे लोखंडी कठडे गायब झाले आहेत. याठिकाणी आता कठड्यांचे पाईप शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात पाण्याच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी असलेले कठडे कोणत्याच पुलावर राहिले नसल्याने कठड्याविना पूल धोकादायक बनले आहेत. कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केल्याने केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिले आहे. वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फूट पाणी वाहत असते. हा रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यातही त्याठिकाणी मोठी वर्दळ असते. पाण्याच्या प्रवाहापासून धोका टाळण्यासाठी असलेले कठडेच शिल्लक राहिले नसल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. काही महिन्यांपूर्वी कठड्यांअभावी कौठा पुलावरून एक दुचाकीस्वार खाली कोसळून मरण पावल्याची दुर्घटना घडली. या भागात अनेक पुलांवर असलेले सिमेंटचे कठडे निकृष्ट कामामुळे कोसळले आहेत. लोखंडी कठड्यांऐवजी सिमेंटचे उत्कृष्ट कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावेत. जेणेकरून ते कठडे गायब होणार नाहीत, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व प्रवासी व्यक्त करीत आहेत. परंतू कठड्यांच्या या प्रश्नाकडे बांधकाम विभागाचे अद्याप लक्ष गेलेले नाही. औंढा व वसमत महामार्गावरील अनेक पुलाचे कठडे कुचकामी ठरले आहेत तर लोखंडी कठडे गायब झाले आहेत. या भागातील कुरूंदा, कौठा, आंबा, वसमत रस्त्यावरील आसना नदीवरील पुलांना कठडेच नसल्याने पावसाळ्यात हे पूल अधिक धोकादायक ठरत आहेत. या चारही ठिकाणच्या नदी पावसाळ्यात दुथडी भरुन वाहत असतात. याकडे लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलांवर संरक्षक कठडे बांधावेत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील नदीवर असलेल्या पुलावरचे लोखंडी संरक्षक कठडे भुरट्या चोरट्यांनी लंपास केले आहेत पुलावर केवळ लोखंडी पाईप शिल्लक राहिला आहे वसमत-कुरूंदा या मुख्य रस्त्यावर असलेल्या कौठा येथील आसना नदीवरील पुलाचे कठडेहीे गेल्या अनेक वर्षांपासून गायब आहेत. या पुलावर दरवर्षी पावसाळ्यात दोन फुट पाणी वाहत असते. पुलावरून ये-जा करताना पादचार्यांसह वाहनधारकांच्या बचावासाठी संरक्षक कठडे बसविण्यात येतात कुरूंदा भागात चार ठिकाणच्या नदीवर बसविलेले कठडे अनेक दिवसांपासून गायब आहेत पूल धोकादायक बनले आहेत