बुद्धिबळाचा खेळ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:38 IST2017-10-03T00:38:47+5:302017-10-03T00:38:47+5:30
महापौरपदासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. अडीच वर्षे महापौरपद मिळणार असल्याने भाजप युतीमधील करार मोडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

बुद्धिबळाचा खेळ सुरू
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापौरपदासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. अडीच वर्षे महापौरपद मिळणार असल्याने भाजप युतीमधील करार मोडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपमधील इच्छुकांनी ‘बुद्धी’बळाचा खेळ सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत महापौरपद भाजपकडे जाणार नाही यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली असून, पूर्वीपासूनच सत्तेची गुरूकिल्ली समजल्या जाणाºया अपक्षांची भूमिका ऐनवेळी निर्णायक ठरणार आहे.
महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंतर महापौर निवडणूक घेण्यात येईल. शिवसेनेकडे चिन्हावर निवडून आलेल्या २८ नगरसेवकांसह दहापेक्षा अधिक अपक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. भाजपकडे स्वत:चे २३ आणि अपक्ष आघाडीतील १२ असे मिळून ३५ नगरसेवक आहेत. एमआयएमकडे २४ नगरसेवक आहेत. ते विरोधीपक्ष म्हणून स्वत:चा उमेदवार उभा करणार, हे निश्चित. आकड्यांचे गणित कोणत्याच पक्षासोबत नाही. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीने एकत्र येऊन अपक्षांच्या कुबड्या घेत सत्तेवर अधिराज्य गाजविले.
आता अडीच वर्षे महापौरपद असल्याने भाजपकडून करार मोडण्याची भाषा करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शहर विकास आराखड्याचे प्रकरण महापौर म्हणून चालविता यावे यासाठी भाजपकडून युती तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक महापौरपद घेतले तर अडीच वर्षे स्थायी समिती सभापती, प्रभाग समित्या, स्थायी समिती सदस्य आदी महत्त्वाच्या पदांवर पाणी फेरावे लागेल.