राजकारण्यांनी यावे; मात्र साहित्यिकांची आब राखूनच
By Admin | Updated: December 18, 2014 00:41 IST2014-12-17T23:38:07+5:302014-12-18T00:41:03+5:30
औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही.

राजकारण्यांनी यावे; मात्र साहित्यिकांची आब राखूनच
औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही. कारण संमेलनाध्यक्ष हीच संमेलनातील सर्वाधिक सन्माननीय व्यक्ती असते, असे मत ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.
बुधवारी शहरात आल्यावर त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. प्रशासनातील उच्चपदांवर काम करून निवृत्त झालेले देशमुख लेखन क्षेत्रातही दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी कथा, कविता, कादंबरी व स्तंभलेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत राजकारण्यांचा वावर नेहमीच चर्चेत असतो.
याबाबत देशमुख म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नेहमीच राजकारण्यांची बरी-वाईट रूपे मी अनुभवलीत. समाजव्यवस्था चालविण्यासाठी प्रशासन व राजकारण या दोन बाबींना पर्याय नाही. साहित्यसुद्धा समाजाचेच प्रतिरूप असते. त्यामुळे राजकारण्यांवर फुली मारणे चुकीचेच आहे. साहित्य संमेलने झाली पाहिजेत या मताचा मी आहे. कारण त्या निमित्ताने वर्षभर लेखकांचा वाचकांशी संवाद होत राहतो. मात्र, संमेलनातील सवंग, उत्सवी बाबी वगळल्या पाहिजेत. मुन्शी प्रेमचंद यांनी प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन स्थापन केली होती. मराठीत अशी संघटना स्थापन करण्यास साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच इंग्रजी शाळा बंदच कराव्यात, असे वक्तव्य केले. त्याबाबत देशमुख म्हणाले की, इंग्रजी शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करणे हा मध्यममार्ग असू शकतो. कारण आज इंग्रजी ही जगातच काय; देशातही ज्ञानभाषा बनली आहे, हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे.